यावल तालुक्यातील मनवेल येथील घटना
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मनवेल गावातील शेत शिवारात कापूस वेचणी करीत असताना महिलेला उजव्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने तिला उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नयना गणेश पाटील (वय ३०) या मनवेल गावात राहत होत्या. त्यांच्या पश्चात सासू-सासरे, पती, एक मुलगा असा परिवार आहे.
ही महिला गुरुवारी शेतशिवारामध्ये कापूस वेचणी काम करत होती. दरम्यान कापूस वेचत असतांना तिच्या उजव्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने उपचाराकरिता यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केले.
उपचार सुरू असताना महिलेची प्रकृती खालावली. तेव्हा तिला तातडीने येथून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र जळगाव येथे नेत असतानांच तिचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गणेश रवींद्र पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन सोनवणे, मोहसीन खान, अलाउद्दीन तडवी करीत आहे. मनमिळाऊ स्वभावाच्या असणाऱ्या विवाहितेच्या अचानक मृत्यूमुळे गावातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.