जळगाव ( प्रतिनिधी ) – कापसाच्या नवीन वाणांची माहिती, उत्पादन वाढीच्या उपाययोजना, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, यांत्रिकीकरण व इतर घटकांबाबत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना माहिती व्हावी, याकरीता जागतिक कापूस दिनाचे औचित्य साधून कृषि विभागातर्फे 7 ऑक्टोबररोजी राज्यस्तरीय कापसू परिषद आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली

येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात कृषी विभागातर्फे या राज्यस्तरीय कापूस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत तज्ञांची चर्चासत्रे व नाविन्यपूर्ण बाबींचे कृषी प्रदर्शन लावण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय कापूस परिषदेच्या नियोजनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे संशोधन संचालक शरद गडाख, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी, कापुस पैदासकार संजीव पाटील, वरिष्ठ कृषि विद्या शास्त्रज्ञ बी.डी. जडे, मोहिम अधिकारी पी. एस. महाजन, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ, महाबीज, जिनिंग प्रेसिंगचे प्रतिनिधी, खाजगी बियाणे कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या परिषदेला कृषीमंत्री दादा भुसे, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, पालकमंत्री गुलाबराव पाटील , कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी सचिव, कृषी आयुक्त, राहुरी परभणी व अकोला कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, राष्ट्रीय स्तरावरील कृषी संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी, कृषी निविष्ठा कंपनीचे प्रतिनिधी तसेच औरंगाबाद, बुलडाणा, जालना, अकोला, नंदूरबार व धुळे या जिल्ह्यातून निवडक शेतकरी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचे कृषी विभागाच्या यूट्यूब चैनलद्वारे प्रसारण करण्यात येणार आहे.







