जळगाव ( प्रतिनिधी ) – भवरलाल जैन यांच्या पत्नी ‘कांताई’ यांच्या स्मृती दिनानिमित्त शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे भवरलाल जैन यांचे प्रेरणादायी विचार लिहिलेल्या फलकाचे अनावरण नुकतेच करण्यात आले
धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथील जी.नाना.पाटील गोशाळेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी घरासमोर लिहिलेल्या या फलकाच्या अनावरणप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे सहकारी अनिल जोशी, अखिल भारतीय महिला बचत गटाच्या अध्यक्षा कृषीभुषण सौ.सुनंदा पाटील, सचिव छाया पाटील, सतखेडा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच कृषिभुषण शरद पाटील, आदर्श शेतकरी गंगाधर पाटील, सौ.मंडाबाई पाटील, डॉ. पुरूषोत्तम बी पाटील, अशोक पाटील, आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील, चंपालाल पाटील, भगवान पाटील, वसंत पाटील, नवल दोधू पाटील, जे.डी.आर्ट यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्या आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रभाकर पाटील भवरलाल जैन यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना म्हणले की , ‘दहावी पास झालो त्यावेळेस वडिल गंगाधर पाटील सालदारकी करायचे, वडिलांकडे 22 गुंठे जमीन तीही नापिक होती. त्यामुळे रोजगारासाठी जैन पाईपमध्ये लागलो. भवरलाल जैन यांच्या नेतृत्व गुणांमुळे प्रभावित झालो. ‘ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट केले तर देशाच्या विकास होतो’असे विचार आत्मसात करण्याचा संकल्प केला. देशी गायीचे संगोपन केलेले उत्पादन सुरू केले. देशी गायीचे दुध, तुप, ताक, अग्निहोत्र साठी लागणाऱ्या गौ-या, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेण आणि लाकुड मिश्रण करून एका विशिष्ट पध्दतीने गौ-या तयार केल्या जातात. यातुन महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य असल्याचे प्रभाकर पाटील सांगतात. प्रत्येक घरात देशी गाय असावी यासाठी ते प्रयत्न करतात. दुध संकलनातुन शेतकऱ्यांना हमी भाव देत ‘मुक्ताई’ हे सतखेडा गावातील उत्पादन मोठ्या शहरांमध्ये पोहोचवतात. हे सर्व भवरलाल जैन यांच्या प्रेरणेमुळेच शक्य झाल्याचे प्रभाकर पाटील सांगतात.