जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील ०३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य बालके शोधण्यासाठी जिल्ह्यात दि. १७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांचे शिक्षण अबाधित राहण्याकरिता सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या नियोजनाकरिता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तर समितीची बैठक पार पडली.
या बैठकीत सह अध्यक्ष श्री अंकित, मुख्य कार्यकारी अधिकारी, अनिल झोपे प्राचार्य, डायट, योगेश पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, विकास पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक तसेच महिला व बालविकास विभाग, आदिवासी विभाग, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. विकास पाटील यांनी सर्वेक्षणाची आवश्यकता व कार्यपद्धती सर्व विभागांना अवगत करून दिली . त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पाच ठळक मुद्द्यांच्या आधारे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सर्वेक्षण दरम्यान जन्म दाखला व शाळेचे जनरल रजिस्टर तपासावे. पाच ते चौदा वयोगटातील सर्व बालके शाळेत गेली अथवा नाही हे पहावे .स्थलांतरित बालकांची नोंद घ्यावी. घरोघरी सर्वेक्षण करावे. गुगल फॉर्म तयार करावा. ही पंचसुत्री सांगितली .
या सर्वेक्षणात शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यात येणार आहे. हा शोध घरोघरी जाऊन, वाड्या वस्त्या, दगड खाणी, वीट भट्ट्या, बसस्थानक रेल्वे स्थानक बाजार साखर कारखाने बालमजूर असण्याची शक्यता असणार अशी ठिकाणे येथे केला जाणार आहे. या सर्वेक्षणात शिक्षण विभागासोबतच महिला व बालविकास विभाग समाज कल्याण विभाग आदिवासी विभाग कामगार विभाग या विभागांचाही सहभाग मिळणार आहे. या सर्वेक्षणात कधीच शाळेत न गेलेले विद्यार्थी एक महिन्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर विद्यार्थी आणि स्थलांतरित बालके या प्रकारातील मुलांचा शोध घेतला जाणार आहे व त्यांना नजीकच्या शाळेत दाखल केले जाणार आहे. बैठकीसाठी उपस्थित अधिकाऱ्यांचे आभार विवेक महाजनी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी मानले.