जिल्हा परिषदेचे मिशन संजीवनी अभियान
वाढते तापमान, पर्यायाने पर्यावरणात होणारे बदल व वाढते काँक्रिटीकरण यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. भूजल पातळीत होणारी घट हा मोठा चिंतेचा विषय बनला असून त्यामुळे भीषण अशा पाणीटंचाई सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भूजल पातळीत होणारी घट भरून काढण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून जळगाव जिल्हा परिषदेने मिशन संजीवनी हे अभियान सुरू केले आहे.
या अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत जिल्हाभरात जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या विविध इमारत बांधकामांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याशिवाय काम पूर्ण झाल्याचा पूर्णत्वाचा दाखला व संबंधित कंत्राटदाराचे देयक अदा करू नये असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दरम्यान मिशन संजीवनी हे अभियान जळगाव जिल्ह्यात सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ७५ गावात २९६ कामांना मान्यता देण्यात आले असून या सर्वच्या सर्व कामांच्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे. पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते जमिनीतच मुरवण्याचा हा प्रयोग एवढा मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात होणार आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पासह जिल्ह्यातील अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, व यावल या तालुक्यातील प्रत्येकी ५ गावांमध्ये होत असलेल्या विविध इमारत बांधकामाच्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे.