जिल्हा काँग्रेसतर्फे गुरुवारी “इंडिया जीतेगा” आनंदोत्सवाचे आयोजन
शुक्रवारी मुंबईत गांधी परिवाराच्या स्वागताला २०० कार्यकर्ते जाणार
जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) – मुंबईत १ सप्टेबर रोजी देशातील “इंडिया” आघाडीची बैठक होत आहे. त्यासाठी सोनिया गांधी, राहूल गांधी व पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे दुपारी एक वाजता मुंबईत दाखल होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळ ते कॉग्रेसचे मुख्यालय टिळक भवनापर्यंत मानवी साखळी तयार केली जाणार आहे. या मानवी साखळीत प्रत्येक जिल्ह्याला स्थळ निश्चित करण्यात आले आहे. त्यात जळगावचाही समावेश असून जळगावातून २०० कार्यकर्ते गुरुवारी रात्री मुंबईला रवाना होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी बुधवारी ३० रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादीतही फूट पडली. काँग्रेसमध्ये फूट पडत नसल्याचे पाहून विरोधक पक्ष प्रवेश व फुटीच्या वावड्या उठवत आहेत. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या लोकसभेत भाजपच्या उमेदवार असतील अशा वावड्या उठविल्या जात आहेत, मात्र त्या कधीही काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी बुधवारी दिली.
जिल्ह्यात ३ सप्टेंबरपासून कॉग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु होत आहे. काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा डेटा ऑनलाईन आहे. जो कोणी पक्षाचा कधी सदस्यच नाही. कोणी तरी कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो आणि तो काँग्रेसचा आहे, काँग्रेसमध्ये खिंडार पडले असे विरोधकांकडून भासविले जात असून दिशाभूल केला जात आहे. कॉग्रेसमध्ये कदापीही फूट पडणार नसल्याचे पवार म्हणाले.
भाजप विरोधी पक्षांनी इंडिया नावाने आघाडी उघडली आहे. लोकसभेत हीच आघाडी जिंकणार असल्याने त्याचा आनंदोत्सव गुरुवारी प्रत्येक तालुक्यात केला जाणार आहे. जळगाव शहरात कॉग्रेस भवनात हा जल्लोष होईल.