भारत – बांगलादेश सीमेजवळ घडली घटना
भडगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील गुढे येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलात नायक पदावर कार्यरत असलेले जवान राहुल श्रावण माळी (३४) हे भारत – बांगलादेश सीमेजवळ पश्र्चिम बंगाल येथील कंचनपुरा येथे दि.२७ देशसेवा बजावत असताना शहीद झाले. यामुळे गुढे गावावर शोककळा पसरल्याने दु:ख व्यक्त केले जात आहे.
त्यांचे पार्थिव शरीर ताब्यात घेण्यासाठी त्याचे मोठे भाऊ अविनाश माळी हे कलकत्ता येथे रवाना झाले असून त्यांचे शुक्रवारी सायंकाळपर्यंत गुढे या मुळ गावी येण्याची शक्यता आहे. संत सावता महाराज पंच कमिटीचे सदस्य श्रावण श्रीधर माळी यांचे सर्वात लहान चिरंजीव राहुल श्रावण माळी हे १४ वर्षापूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. ते आता पश्चिम बंगाल येथील कंचनपुरा येथे नायक पदावर सेवा बजावत असताना दि.२७ रोजी रात्री शहिद झाले. ते कुंटुबासह आर्मी सेंटर मध्ये वास्तव्यास होते.
बराकपूर येथील आर्मी हॉस्पीटल येथे आज शवविच्छेदन करून त्यांचे पार्थिव शरीर आज नातेवाईक यांच्या ताब्यात दिल्यानंतर ते मुळ गावी येतील. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, शिव वय वर्ष ४ व शंभु वय दीड वर्ष अशी आहेत. वडील, आई व दोन मोठे भाऊ वहिनी, पुतणे असा परिवार असून ते प्राथमिक शिक्षक अविनाश माळी यांचे लहान बंधू आहे. त्यांचा शासकीय इंतमामात गुढे जुवार्डी फाट्यवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.