जळगाव तालुक्यात आव्हाणे येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – जमावाकडून झालेल्या बेदम मारहाणीत एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील अव्हाणे शिवारात घडली आहे. मुलाला पळवून नेण्याच्या संशयावरून हा प्रकार घडला असून, या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

जळगाव ते कानळदा रोडवरील अव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंग परिसरात सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी रात्री ७ ते ८ वाजेच्या सुमारास एक अनोळखी तरुण संशयास्पदरीत्या वावरत होता. हा तरुण तिथे राहणारे मनोहर भगवान सोनवणे यांचा ३ वर्षांचा मुलगा विराट उर्फ लकी याला उचलून घेऊन जात असल्याचा संशय उपस्थितांना आला. या संशयाने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि बघता बघता मोठा जमाव गोळा झाला. जमावाने कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता किंवा पोलिसांना कळवण्याऐवजी सदर तरुणाला पकडून लाथा-बुक्क्यांनी आणि मिळेल त्या वस्तूने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
आव्हाणे गावचे सरपंच पिंटू पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव तालुका पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असता, त्यांना तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या नाका-तोंडातून रक्त येत होते आणि शरीरावर गंभीर जखमा होत्या. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला पोलिसांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला आणि शरीराच्या अंतर्गत भागाला मार लागल्याने तो शुद्धीवर येऊ शकला नाही. अखेर मंगळवारी २४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४:३० वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत मनोहर भगवान सोनवणे(रा. नांद्रा ता. जळगाव), अजय डोंगर कोळी(रा. थोरगव्हाण ता. यावल), प्रशांत उर्फ प्रकाश शशिकांत सोनवणे, अजय ऊर्फ बादल शशिकांत सोनवणे (रा. बामणोद ता. यावल) आणि अफताब आरिफ खाटीक (रा. शनिपेठ, जळगाव) अशा पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पोहेकॉ श्रीकांत बदर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांसह इतर अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘मॉब लिंचिंग’चा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.







