ठेका मिळाल्यास ऑगस्टपासून करणार साफसफाई
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील साफसफाई अन् स्वच्छतेचा ठेका भारत विकास ग्रुप या संस्थेने घेतला असून ३ कोटी ५८ लाखांची बँक गॅरंटी महापालिकेकडे जमा केली आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेचा ठेका देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. साधारणतः ऑगस्टपासून बीव्हीजी ग्रुप शहर स्वच्छतेचे काम सुरू करणार आहे.
शहरातील साफसफाई आणि स्वच्छतेचा ठेका वॉटरग्रेस या कंपनीला देण्यात आला होता. कंपनीसंदर्भात अनेकदा वादही निर्माण झाले. या कंपनीला ठेका देण्यावरून अनेक नगरसेवकही संशयाच्या भोवऱ्यात होते. दरम्यान, या कंपनीची पाच वर्षांची मुदत संपत्याने महापालिका प्रशासनाने नव्याने निविदा मागविल्या होत्या. यात बीव्हीजी अर्थात भारत विकास ग्रुप संस्थेसह आणखी दोन जणांनी निविदा दाखल केल्या होत्या. या प्रक्रियेत बीव्हीजी या संस्थेने महापालिकेकडे १ कोटी ५८ लाखांची बयाणा रक्कमही भरली होती. मात्र, संस्थेने बँक गॅरंटी जमा केली नव्हती.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्याने बीव्हीजी संस्थेने महापालिकेकडे ३ कोटी ५८ लाखांची बँक गॅरंटी जमा करून कंत्राट मिळण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.जोपर्यंत नवीन कंत्राट दिले जात नाही, तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या वॉटरग्रेस कंपनीला शहर स्वच्छतेचे काम करावे लागणार आहे. कंत्राट देण्यासंबंधीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बीव्हीजी संस्था साधारणतः ऑगस्टपासून काम सुरू करण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे यांचा निवडणूक समितीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेला आस्थापना विभागाचा भार हलका करण्यात आला आहे.