जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीची ३८ वी सर्वसाधारण सभा संपन्न
जळगाव (प्रतिनिधी) – जगात प्रतिकूल परिस्थिती असताना ५०० कोटीची पाईप आणि इतर उत्पादने निर्यात व ३५० कोटींची फळप्रक्रिया उद्योगांमध्ये जैन इरिगेशन कंपनीने निर्यात केली. पाईप, सूक्ष्मसिंचन, टिश्यूकल्चर, फळ भाजीपाला प्रक्रिया उद्योग, प्लास्टिक शिट व सौलर विभागातून सकारात्मक दृष्टीने वाटचाल करत भविष्यात १००० कोटींचे निर्यातीचे उद्दिष्टे कंपनीचे आहे. ‘सहनशक्तीने रूजलेले, उत्कृष्टतेत फुलणारे’ या संकल्पनेच्या आधारावर भारतातील १४ कोटी शेतकऱ्यांपैकी एक कोटी शेतकऱ्यांपर्यंत कंपनी पोहचली आहे. गुणवत्ता व विक्री पश्चात सेवेतून मिळालेल्या विश्वासावर कंपनी खरी ठरली आहे. शेत, शेतकऱ्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी जगातील सर्वात्तम तंत्रज्ञान अल्पभुधारक शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणार असल्याचेही कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन म्हणाले.
बांभोरी येथील जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या प्रशासकीय इमारतीसमोरील हिरवळीवर कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी अनिल जैन यांनी भागधारक, सहकारी यांच्याशी संवाद साधला. व्यासपीठावर कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, कंपनी सचिव अवधुत घोडगावकर, लेखापरिक्षक नविंद्रकुमार सुराणा, जैन फार्मफ्रेश फुडूस लि. चे संचालक अथांग जैन, अभंग जैन होते. सभेवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे स्वतंत्र संचालक अशोक दलवाई, नरेंद्र जाधव, सतिशचंद मेहता उपस्थित होते. स्क्रृटीनायझर अमृता नौटीयाल यांच्या उपस्थितीत ई-वोटिंग झाले. सुरवातीला गत सभेपासून या सभेपर्यंत दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावर्षीच्या सभेत सभा पटलात एकूण सात विषय मंजुरीसाठी मांडण्यात आले होते. ज्यात कंपनीच्या आर्थिक प्रगतीचा अहवाल, तांत्रिक नवकल्पना, भविष्यातील विक्री गुंतवणूक धोरणे, तसेच सहव्यवस्थापकिय संचालकपदी अतुल जैन व डॉ. नरेंद्र जाधव यांची स्वतंत्र संचालकपदी पूणर्नियुक्तीसह ऑडिटर निर्णयांचा समावेश होता.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या ३८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष अनिल जैन यांनी शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) वाढत्या उपयोगावर प्रकाश टाकला. यांनी सांगितले की, AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज, पीक पद्धतीतील सुधारणा, तसेच योग्य वेळी हार्वेस्टिंगचे मार्गदर्शन मिळू शकते, ज्यामुळे उत्पादनात व आर्थिक लाभात मोठी वाढ होऊ शकते. ‘क्लायमेंट चेंज’ हवामान बदलाचा शेतीवर होत असलेल्या दुष्परिणामांमुळे शेतकऱ्यांना नवनवीन आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी नेट हाऊस, पॉलीहाऊस, एरोपोनिक, हायट्रोपोनिक फार्मिंगसारख्या फ्युचर फार्मिंग (भविष्यातील शेती) आधुनिक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे; यासाठी ‘जैन क्लायमेंट स्मार्ट सोल्युशन’ हे तंत्रज्ञान प्रभावी ठरणार आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अनेक भागात कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे ओला दुष्काळ निर्माण झाला आहे. या स्थितीत शेतकऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, जेणेकरून अशा नैसर्गिक आपत्तींना प्रभावीपणे तोंड देता येईल.
नव्याने बदल झालेल्या जीएसटी पॉलिसीमुळे ड्रीप, स्प्रिंकलर, सौलर कृषी पंम्प यांच्या किंमतीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्याचा वापर अतिरीक्त तंत्रज्ञान स्विकारण्यास मदत होईल, कंपनीने शेतीत नवोन्मेष व तंत्रज्ञानास साहाय्य देणे, शेतकऱ्यांचे हित जपणे, आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देण्याचा निर्धार केला आहे. बदलत्या वातावरण परिस्थितीला उत्तर देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने पुढाकार घ्यावा, असे आवाहन अनिल जैन यांनी केले.
यावर्षी केळीची ४००० कोटी रूपयांची निर्यात झाली आहे. त्यात जैन इरिगेशनची टिश्यूकल्चर तंत्रज्ञानातून विकसीत झालेली गुणवत्तापूर्ण केळीला जगात प्राधान्य आहे. विदेशातील मागणी पाहता टिश्यूकल्चर रोपांची मागणी वाढत आहे त्यामुळेच टिश्यूकल्चर विभागाच्या विस्तारीकरणावर भर दिला जाणार आहे, असे सूतोवाचही अनिल जैन यांनी केले.
अनुभूती निवासी स्कूलचे विद्यार्थ्यांनी सभेच्या कामकाज समजावे म्हणून सहभाग घेतला. सभेनंतर अनिल जैन यांनी त्यांच्यासोबत संवाद साधून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसरण केले. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला.
सहकाऱ्यांच्यावतीने अशोक जैन यांचा हृद्य सत्कार
मुंबई येथील चक्रव्हिजन इंडिया फाउंडेशनतर्फे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांना ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन पीस अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. कृषीपुरक कार्याला अधोरेखित करत हा पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानिमित्ताने कंपनीतील सहकाऱ्यांच्या वतीने अशोक जैन यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.