समान नागरी कायद्याला सर्वसंमतीने विरोध ठराव पारित
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील अजिंठा चौक येथील मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टच्या वतीने इदगाह मैदानावर हजारोच्या संख्येने लोकांनी ईद-उल अझहा अर्थातच बकर ईद ची नमाज अदा केली. यावेळी मौलाना उस्मान कासमी यांनी विश्वशांतीसाठी प्रार्थना केली व खास करून भारत देशात सर्व समाजाला एकत्रित ठेवून त्यांच्यात अमन व शांती राहावी यासाठी अल्लाहाकडे साकडे घातले.
समान नागरी कायद्याला विरोध – ठराव पारित
जळगाव शहरातील सुमारे ८ ते१० हजार लोकांच्या साक्षीने भारत सरकारने विधी आयोगामार्फत नोटीस काढून समान नागरी कायदा बाबत विचारणा केली आहे त्या कायद्याला मुस्लिम समाजाचा संपूर्णपणे विरोध असून या मुळे भारतातील सर्व धर्मातील सांस्कृतिकपणास बाधा येऊन त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल म्हणून आम्ही या समान नागरी कायद्याला विरोध दर्शवीत आहोत अशा आशयाचा ठराव फारूक शेख यांनी मांडला असता सर्वांनी अल्लाहू अकबर असे म्हणून त्यास मान्यता दिली.
ट्रस्टच्या घटनेत बदल
ईदगाह ट्रस्ट ची घटना – स्कीम मध्ये १९९७ पासून सुधारणा झाली नसल्याने व वक्फ बोर्ड ला सुध्दा नवीन योजना २०११ पासून दिली गेली नसल्याने त्यात विविध मुद्दे समाविष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणे जळगाव शहरातील १५ वार्डाचे १९ वार्ड करण्यात आले तर स्वीकृत सदस्यांची संख्या ६ वरून २ करण्यात आली.
सदर बदल घटना समितीच्या अहवालावरून घेण्यात येत असल्याचे अध्यक्ष वहाब मलिक यांनी सुचविले.
पोलीस दलातर्फे शुभेच्छा
ईदगाह मैदानावर पोलीस अधीक्षक एम् र्राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन पाटील व जयपाल हिरे सह मोठ्या प्रमाणात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस दलातर्फे आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांचा प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल वहाब मलिक, जनरल सेक्रेटरी फारुख शेख, सहसचिव अनिस शहा व मुकीं शेख, सदस्य एजाज मलिक, ताहेर शेख, अशपाक बागवान, निजाम मुलतानी रेहान खाटीक, शरीफ पिंजारी व मुकीम शेख आदींनी त्यांचे स्वागत केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव अनिस शाह यांनी केले तर आभार संचालक ताहेर शेख यांनी मानले.