हिंगणघाट –राज्य हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी प्राध्यापकाविरुद्ध आरोप सिद्ध झाले असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे. ४२६ पानांचं आरोपपत्र, ६४ सुनावणी आणि २९ साक्षीदार यात तपासण्यात आले असून ख्यातनाम सरकारी वकील अँड. उज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. उद्या १० रोजी या खटल्याचा निकाल न्यायालय देणार आहे.

आरोपीला ११.३० वाजता चोख पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी पक्षाचे वकील ॲड उज्वल निकम, आरोपी पक्षाचे वकील ॲड भूपेंद्र सोने न्यायालयात हजर झाले. याचसोबत पीडितेचे आई-वडीलदेखील न्यायालयात दाखल झाले होते. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोप सिद्ध झाले असून या जळीतकांड प्रकरणात आरोपी दोषी ठरविण्यात आले आहे. आता या खटल्याचा निकाल उद्या गुरुवारी १० फेब्रुवारीला येणार असल्याची माहिती सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांनी दिली आहे.
कशी घडली घटना
पीडिता हिंगणघाटच्या स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. यामध्ये पीडिता ३ फेब्रुवारीला २०२० ला सकाळी तिच्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता. पीडिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतील काढलेले पेट्रोल तिच्यावर ओतले आणि तिला पेटवले. यात गंभीररित्या जळालेल्या पीडितीचा नागपूरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता








