जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली, शासकीय रुग्णालयात प्रचंड गर्दी
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शनिपेठ परिसरातील कांचननगर भागात रविवारी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून दोन गटात वाद झाला. या वादात झालेल्या गोळीबारात १ जण ठार तर २ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत. यामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली असून पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.
काही दिवसांपासून गुन्हेगारांनी शहरात दहशत माजवली आहे. एमआयडीसी परिसरातील गोळीबाराची घटना ताजी असताना आता रविवारी दि. ९ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास कांचननगर भागात दोन गटांमध्ये पूर्ववैमनस्यातून वाद निर्माण झाला. वाद चिघळत जाऊन त्याचे रूपांतर थेट गोळीबारात झाले. या गोळीबारात आकाश युवराज बाविस्कर (वय २८, रा. कांचन नगर, जळगाव) हा मयत झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर गणेश रविंद्र सोनवणे (वय २६) व तुषार सबसिंग सोनवणे (वय २६, दोन्ही रा. कांचन नगर, जळगाव) असे दोघे जखमी झाले आहेत. घटनास्थळावर तात्काळ स्थानिक नागरिकांची गर्दी झाली.
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत गोळीबार करणाऱ्यांमध्ये दोन जणांची नावे समोर येत असून अधिकृत माहिती पोलीसांकडून अद्याप समोर आलेली नाही. तर एलसीबीची टीम देखील गुन्हेगाराच्या शोधार्थ रवाना झाली असल्याची माहिती मिळत आहे. सदर गोळीबार हा लाडू गँगच्या म्होरक्या याच्या टोळीकडून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान गोळीबारामध्ये तरुण मृत्युमुखी पडल्याने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.सदर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.









