जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील शाहूनगर परिसरात शनिवारी रात्री खाद्यपदार्थांच्या गाडीवर गोंधळ झाला. यावेळी रात्री गस्तीवर असलेले पोलिसांचे वाहन आले त्यावेळी जमावातील कुणीतरी पोलीस जीपची चावी काढून घेतली. तणाव वाढत असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला होता.
शाहूनगर परिसरात रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू असतात. काल शनिवारी रात्री खाद्यपदार्थ गाडीवर गोंधळ सुरू होता त्याच वेळी शहर पोलीस ठाण्यातील 112 पोलीस मदत वाहन पोहोचले. पोलीस जमावाला समजावत असताना कुणीतरी टारगट मुलांनी पोलीस जीपची चावी काढून घेतली. घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा शाहूनगरमध्ये पोहोचला.
पोलीस जीपची चावी भेटल्याशिवाय पोलीस परिसरातून हटणार नाही अशी भूमिका सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी स्पष्ट केली. समाजातील काही सुज्ञ नागरिकांनी मशिदीतून माईकद्वारे आवाहन केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात चावी आणून देण्यात आली.
पोलिसांनी एक सिलिंडर एक हातगाडी आणि काही साहित्य जप्त केले आहे. गोंधळ घालणाऱ्या काही जणांची नावे देखील घेतली आहेत.