जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाण्याची आवक वाढली असून, शनिवारी दि.२४ सायंकाळी ६ वाजता ४९.६५ टक्के जलसाठा झाला आहे. रविवारी दि.२५ला जलसाठा ५० टक्के पेक्षा अधिक होईल, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील १८८ पाणीपुरवठा योजनांचे एकमेव स्रोत असणाऱ्या गिरणा धरणात यावर्षी पाण्याची आवक धिम्या गतीने सुरु आहे. जून, जुलै या दोन महिन्यांत जलसाठ्यात अत्यल्प वाढ झाल्याने चिंता वाढली होती. मात्र, मध्यंतरी झालेला आणि गत चार दिवसांपासून सुरु असलेला पाऊस धरणासाठी उपयोगी ठरला आहे. धरणाच्या वरील भागात असणाऱ्या धरणातून पाण्याची आवक होत आहे.
गत २४ तासांत ३२ मिमी पाऊस झाला असून, गिरणा धरण परिसरातही पाऊस सक्रिय आहे. गिरणा धरणावर असणारे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याची आवक होत आहे.चणकापूरमधून ६८७० तर पुनंद ४६०, ठेंगोडा ५१०२, हरणबारी ४००, केळझर १९८ क्युसेक आवक गिरणा धरणात होत आहे.