भाजपाकडून मंगेशदादा, राजूमामा, सावकारे यांची नावे चर्चेत
मुंबई (विशेष प्रतिनिधी) :- राज्याच्या सत्तास्थापनेचा तिढा सुरूच आहे. या मंत्रिमंडळात अनेक जण संधी मिळावी म्हणून नेत्यांकडे चकरा मारीत आहेत. मात्र भाजपची नवीन रणनीती आता समोर येत आहे. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजप आता संकटमोचक गिरीश महाजन यांना प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याची शक्यता दिसून येत आहे.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी देऊन गिरीश महाजन यांना आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणूकामध्ये विजयी होण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पद दिले जाणार असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. यात गिरीश महाजन यांची संकटमोचक म्हणून असलेली भूमिका महत्वाची ठरणार आहे. राज्यात अधिकाधिक जिल्हा परिषद, महानगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व राहण्यासाठी भाजपने नवीन रणनीती आखली आहे. त्यासाठी गिरीश महाजन यांना प्रामुख्याने विचारात घेतले जात आहे. दुसरीकडे महाजन यांच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्येही त्यांना मंत्रिपद मिळेल असा उत्साह दिसून आलेला नाही. तर जळगाव ग्रामीण येथे सेनेचे गुलाबराव पाटील हे उप मुख्यमंत्री होतील असे बॅनर लावण्यात आलेले आहे.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील. तसेच, त्यांना नवीन टीम मंत्रिमंडळात देऊन राज्यात नवीन नेतृत्व तयार करण्याची भारतीय जनता पार्टीची व्यूहरचना आहे. जर गिरीश महाजन प्रदेशाध्यक्ष झालेत तर जळगाव जिल्ह्यातून भाजपकडून मंत्री म्हणून खान्देशातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले व हॅट्ट्रिक केलेले आ.राजूमामा भोळे, चौथ्यांदा विजयी व विशेष प्रवर्गातून आमदार झालेले संजय सावकारे तसेच चाळीसगाव येथून मागील पहिल्याच टर्ममध्ये विकासकामांसाठी कौतुक झालेले आ. मंगेश चव्हाण यांचे नाव अग्रक्रमाने पुढे येत आहे.