जळगावची वांगी, केळीचाही आहे समावेश, आणखी वस्तू होणार समाविष्ट
जळगाव (प्रतिनिधी) – राज्याच्या विविध जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंना जी. आय. मानांकनप्राप्त झाले आहे. आणखी अनेक वस्तू मानांकन मिळण्याच्या मार्गावर आहेत. यात विशेषत: फळे, धान्य आदी खाद्यपदार्थांसह काही वस्तूंचा समावेश आहे. जी. आय. प्रमाणपत्रामुळे वस्तू उत्पादकांना दुप्पट फायदा होत आहेच, शिवाय ग्राहकांची फसवणूक टळून त्यांना योग्य वस्तू मिळू लागल्या आहेत. भौगोलिक चिन्हांकन (जी. आय.) मानांकन मिळविण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. मानांकनात जळगावची केळी व भरताची वांगी यांचाही समावेश आहे.
एखाद्या विशिष्ट वस्तूशी निगडीत मानांकन वा चिन्ह ज्याचा संबंध भौगोलिक स्थान किंवा उगमस्थानाशी (उदा. शहर, प्रदेश, देश) असतो त्या मानांकनास भौगोलिक मानांकन असे म्हणतात. भारत जागतिक व्यापार संघटनेचा एक भाग असल्याने दि. १५ सप्टेंबर २००३ पासून मालाचे भौगोलिक मानांकन (नोंदणी आणि संरक्षण) कायदा, १९९९ लागू करण्यात आला. भौगोलिक मानांकनामुळे, भौगोलिक मानांकनप्राप्त वस्तूचे नाव अधिकृत वापरकत्यांव्यतिरिक्त इतर कोणीही वापरू शकत नाही. २००४-२००५ साली दार्जिलिंगच्या चहाला भारतातले पहिले भौगोलिक मानांकन मिळाले होते.
भौगोलिक वैशिष्ट्य असणाऱ्या वस्तूंना जी. आय. मानांकन मिळविण्यात महाराष्ट्र आघाडीवर असणारे राज्य आहे. सध्या २५ हून अधिक वस्तूंना जी. आय. मानांकनप्राप्त झाले असून आणखी १३ वस्तूंना मानांकन मिळविण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकार व नाफेड संस्थेच्या मार्केटिंग फेडरेशनच एम. डी. सुधाकर तेलंग, जी. आय. अभ्यासक प्रा. गणेश हिंगमिरे व सहकारी पाठपुरावा करत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन वस्तूंना यापूर्वी जी. आय. मानांकन प्राप्त झाले आहे. यात कोल्हापुरी गूळ आणि आजरा घनसाळ तांदूळ यांचा समावेश आहे. या दोन वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीपाठोपाठ कोल्हापुरी स्वाबदार फेट्यालाही जी. आय. मानांकन मिळणार आहे. यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. फेट्याला मान्यता, त्याचे परीक्षण झाले असून लवकरच नोटिफिकेशन होऊन गॅझेट होणार असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे.
जी. आय. मानांकनप्राप्त उत्पादने, कंसात कार्यक्षेत्र : स्ट्रॉबेरी (महाबळेश्वर), द्राक्षे (नाशिक), संत्री (नागपूर), आजरा घनसाळ तांदूळ (कोल्हापूर), वायगाव हळद (वर्धा), ज्वारी (मंगळवेढा), वाघ्या घेवडा (कोरेगाव-खटाव सातारा), तुरडाळ (नवापूर नंदूरबार), आंबेमोहोर तांदूळ (पुणे), काजू (वेंगुर्ला सिंधुदुर्ग), बेदाणा (सांगली), कांदा (लालसगाव), घोलवड चिक्कू (डहाणू ठाणे), सीताफळ (बालाघाट बीड), मोसंबी (जालना), केळी (जळगांव), मराठवाडा केशर आंबा (छ. संभाजीनगर), पुरंदर अंजीर (पुणे), भरीताची वांगी (जळगाव), डाळिंब (सोलापूर), हापूस आंबा (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर), कोकम (रत्नागिरी- सिंधुदुर्ग), गूळ (कोल्हापूर), मिरची (भिवापूर-नागपूर).