जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद जवळ असणाऱ्या वाघूर धरणाच्या पाटाच्या पुलाच्या चारीतील वाहत्या पाण्यात तीन बालक पोहायला गेले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडून मृत्युमुखी पडले. तिघेही बालक हे नशिराबाद येथील भवानी नगर येथील असून शोककळा पसरली आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पाऊस चांगला झाला असल्यामुळे नद्या, नाले, धरणे तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे पोहायला व फिरायला जाणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. वाघूर धरण देखील पूर्णपणे भरलेले असल्यामुळे तेथे अनेक जण पर्यटनासाठी व पोहायला जातात. सोमवारी दुपारी ३ वाजता नशिराबाद येथील भवानी नगरचे रहिवासी मोहित दिलीप नाथ (वय १२), आकाश विजय जाधव (वय १३), ओम सुनील महाजन (वय ११) हे तिघेही वाघूर धरणावर पोहायला गेले होते. दरम्यान, सुभाष वाणी यांच्या शेताजवळ पाटाच्या पुलाच्या चारीत पाण्यात पोहण्यास उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते गटांगळ्या खाऊ लागले. जवळ असणाऱ्या लोकांनी पोलिसांना व ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस घटनास्थळी पोहोचले.
त्यांनी पहिले मोहितचा मृतदेह बाहेर काढला. त्यांनतर वाहून जात असताना आकाश व ओम यांचे मृतदेह मिळाले. तिघेही जणांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी रवाना केले. यावेळी एपीआय प्रवीण साळुंखे, सचिन कापडणीस, हवालदार प्रवीण ढाके, पोना रवींद्र इंधाटे यांनी धाव घेतली होती. सोपान विठोबा वाणी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तिघेही बालकांच्या मृत्यूमुळे नशिराबादवर शोककळा पसरली आहे.