रावेर तालुक्यातील निंभोरा येथील घटना

रावेर (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागामध्ये केळीला भाव मिळण्यासाठीचा विषय प्रचंड पेटला आहे. अशातच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रविवारी दि. ५ मे रोजी रावेर शहरात सभा घेतली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. मात्र दुसऱ्या दिवशी सोमवारी दि. ६ मे रोजी पहाटे तालुक्यातील एका शेतकऱ्याने केळी पिकाला भाव मिळत नाही म्हणून झाडाला फाशी घेत स्वतःचे जीवन संपवले. अतिशय विदारक अशी ही घटना तालुक्यातील निंभोरा येथे उघडकीस आली आहे. दरम्यान, आता तरी केळीला भाव मिळालेच पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हर्षल रवींद्र नेहते (वय ३८, रा. निंभोरा ता. रावेर) असे मयत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. निंभोरा गावात तो त्याच्या परिवारासह राहत होता. शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, रावेर तालुक्यातील केळी पट्ट्यामध्ये केळीला भाव मिळत नसल्यामुळे बहुसंख्य शेतकरी हे चिंताग्रस्त झाले आहेत. त्यातच हर्षल देखील केळीला भाव नसल्यामुळे चिंताक्रांत झालेला होता.
सोमवारी दि. ६ मे रोजी पहाटे त्याने स्वतःच्या शेतात विहिरीजवळील रामफळाच्या झाडाला दोरीचा गळफास लावून आत्महत्या केली. ग्रामस्थांना घटना समजताच त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. हर्षलच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. या प्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनने घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारीच घेतली होती सभा
दरम्यान या केळी पट्ट्यात केळीचे भाव दररोज घसरत असल्याने आणि पाचशे रुपयापर्यंत भाव आल्यामुळे त्या भावाला लागलेला खर्च देखील वसूल होत नसल्यामुळे उत्पादकांमध्ये कमालीची नाराजी वाढलेली आहे. अशातच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रविवारी दि. ५ मे रोजी रावेरमध्ये शेतकरी व बाजार समितीच्या संचालकांची बैठक घेतली. त्यात संवाद साधून म्हणणे ऐकून घेतले. मात्र आता दुसऱ्याच दिवशी केळी पिकाला भाव नसल्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने समाजमन चिंतेत झाले आहे. केळी भावाला तातडीने हमीभाव वाढवून मिळाला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. हर्षल नेहेते हा तरुण मनमिळाऊ स्वभावाचा आणि कष्टकरी असल्यामुळे त्याच्या मृत्यूविषयी हळहळ व्यक्त केली जात आहे.









