भुसावळ विभागात ६ लाख १८ हजारांचा दंड वसूल
भुसावळ (प्रतिनिधी) : वाढत्या गर्दीचा फायदा घेत अनेक फुकटे प्रवासी जनरल तसेच स्लीपर डब्यातून प्रवास करीत असल्याने अशा प्रवाशांवर डीआरएम ईती पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाद्वारे सातत्याने कारवाई केली जात आहे. विशेष पथकातील टीटीआय निसार खान यांनी दि. १३ ते १७ एप्रिल दरम्यान ४५४ प्रकरणांद्वारे ६ लाख १८ हजारांचा दंड वसुल करीत विक्रम प्रस्थापीत केला आहे.
भुसावळातील भरारी पथकातील टीटीआय निसार खान यांनी यापूर्वी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी एकाच दिवशी २२७ प्रवाशांवर कारवाई करीत २ लाख १ हजार ७५० रुपयांचा तर १ मार्च २०२५ रोजी १७९ प्रकरणात १ लाख ५३ हजार ७०० रुपये दंड वसुल करीत नवा विक्रम प्रस्थापीत केला होता. तर दि. ७ व ८ एप्रिलला ११२ प्रवाशांवर कारवाई करीत १ लाख ४२ हजारांचा दंड वसुल केला होता. त्यानंतर १३ एप्रिल रोजी २१५ प्रकरणांच्या माध्यमातून २ लाख ७४ हजार १५ रोजी १२५ प्रकरणात १ लाख ४० हजार तर १६ एप्रिल रोजी २ लाख ४ हजार ५५० रुपयांचा दंड वसुल केला.
भुसावळ रेल्वे स्थानकावर दिवसभरात किमान दोनशेहून अधिक रेल्वे गाड्या थांबतात व त्यातून हजारो प्रवासी चढ-उतार करून प्रवास करतात. अनेकदा प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहून काही प्रवासी तिकीट काढणे टाळतात शिवाय जनरल तिकीटावर स्लीपर वा एसी डब्यात जावून बसतात. यामुळे रेल्वेचे मोठे नुकसान होते. अशा प्रवाशांवर भरारी पथकाकडून धडक कारवाई केली जात आहे. रेल्वे प्रवाशांनी नियमांचे पालन करावे. शिवाय प्रवासात योग्य तिकीट घेवून प्रवास करावा व दंडात्मक कारवाई टाळावी, असे भुसावळच्या डीआरएम ईती पाण्डेय म्हणाल्या. तिकीट खिडकीवरील रांगा टाळण्यासाठी युटीएस अॅपचा वापर केल्यास वेळेची बचत होईल, असेही त्यांनी सांगितले.