अपक्ष उमेदवार ॲड. पियूष पाटील यांचा निवडणूक आयोगाकडे मागणी करून इशारा
जळगाव प्रतिनिधी : निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता धोक्यात आणणाऱ्या आणि लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध आता कायदेशीर बडगा उगारला जाणार आहे. प्रभाग क्रमांक ५ मधील सर्व बोगस आणि दुबार नोंदणी असलेल्या मतदारांची गय केली जाणार नाही; त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करणार असल्याचा कडक इशारा उमेदवार ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांनी दिला आहे.


नुकतीच निवडणूक मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभाग क्रमांक ५ मध्ये मोठ्या प्रमाणावर गंभीर त्रुटी असल्याचे समोर आले आहे. यादीच्या पडताळणी दरम्यान धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. अनेक मतदारांची नावे दोन वेगवेगळ्या ठिकाणी किंवा प्रभागांत आहेत.
संबंधित प्रभागात राहत नसतानाही अनेकांची नावे जाणीवपूर्वक नोंदवण्यात आली आहेत. बोगस कागदपत्रांच्या आधारे नवीन मतदार नोंदणी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रभाग ५ अ चे अपक्ष उमेदवार ॲड. पियूष पाटील यांनी आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला. ते म्हणाले की, “केवळ निवडणूक जिंकण्याच्या स्वार्थासाठी बोगस मतदारांची फौज उभी करणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. एकाच पत्त्यावर अनेक अनोळखी व्यक्तींची नावे असणे हा प्रकार संशयास्पद आहे. आम्ही या सर्व नावांची सखोल पडताळणी केली असून, पुराव्यांसह प्रशासनाकडे तक्रार दिली आहे. जे लोक बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करतील, त्यांची मी थेट तक्रार करणार आहे.”
ॲड. पियूष पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहेत. मतदार यादीतील दुबार नावांची तात्काळ छाटणी करण्यात यावी. ज्या पत्त्यांवर संशयास्पद नोंदणी झाली आहे, तिथे प्रशासनाने प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी. बोगसगिरी करणाऱ्यांवर आणि त्यांना साथ देणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करावेत, अशा मागण्या केल्या आहेत.









