जगातला सर्वात आनंदी देश कोणता?? खूप कमी लोकांनी या देशाचे नाव ऐकले असेल. या देशाचे नाव आहे फिनलँड. युरोपमध्ये उत्तरेला असलेला हा देश रशियाला लागून आहे. जगातील सर्वात आनंदी देशाचा बहुमान या देशाला सलग सातव्यांदा मिळाला आहे. संपूर्ण देशच आनंदी कसा असेल याचे उत्तर आपल्याला या देशाच्या संस्कृतीमध्ये मिळते.
सुरुवातीला इतिहासातील दोन उदाहरणे बघूया. १९३९ साली दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर लगेच तीन महिन्यांनी आपल्या साम्राज्यवादी धोरणांमुळे रशियाने फिनलँडवर युद्ध लादले. जेव्हा रशियन सैनिक फिनलँडमध्ये शिरले तेव्हा तेथील नागरिकांनी आपली घरं, धान्य, साधनसंपत्ती रशियन सैन्याच्या हातात पडू नये म्हणून चक्क आपली घरं, शेती आणि स्वतःची इतर साधन संपत्ती पूर्णपणे जाळून टाकली . देशासाठी या लोकांनी असा असीम त्याग दाखवला. ही फिनलँडच्या लोकांची खासियत. फिनलँडच्या देशप्रेमी नागरिकांनी जीवावर उदार होऊन केलेल्या प्रखर विरोधामुळे हा छोटासा देश जिंकायला रशियाला खूप मोठी किंमत मोजावी लागली.
विशेष म्हणजे दोनच वर्षांनी १९४१ साली जर्मनीने रशियावर हल्ला केला. त्यावेळेला जर्मनीने फिनलँडला रशियावर पश्चिमेकडून हल्ला करायला सांगितले. फिनलँडने हल्ला तर केला मात्र फक्त रशियाच्या ताब्यातील आपली जमीन सोडवली. रशियाची जमीन ताब्यात घेण्यास मात्र त्यांनी चक्क नकार दिला.
त्यांच्या अशा वागण्यामुळे साम्राज्यवादी रशिया आणि जर्मनी दोन्ही देशांना आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला. साम्राज्यवादासाठी जगावर दुसरे महायुद्ध लादलं गेलं मात्र याच काळात फिनलँडच्या लोकांनी आपल्या माणुसकीचे दर्शन घडवले. देशासाठी त्याग असो किंवा मग प्रचंड समाधानी वृत्ती असो फिनलँडच्या माणसांच्या स्वभावामध्ये या अद्भुत गुणांचे दर्शन घडते. आज फिनलँड जगातील सर्वात आनंदी देश आहे. कारण येथील समाज आजही अनमोल मानवी गुणांना सर्वाधिक महत्त्व देतो.
फिनलँडचे लोक भौतिकवादाला जास्त महत्त्व देत नाही. यश किंवा श्रीमंती या गोष्टींमागे धावणे त्यांना पसंत नाही. ते आपल्या गरजेपुरत्या वस्तू जमवतात. कोणताही फिनलँडचा नागरिक आपली तुलना शेजाऱ्यांशी करत नाही. त्याऐवजी ते शेजाऱ्यांशी मैत्रीपूर्ण, सौहार्दपूर्ण संबंध ठेवतात. फिनलँडमध्ये निसर्गाची विशेष काळजी घेतली जाते. या देशात कोणताही विकास करताना पर्यावरणाला इजा होणार नाही याकडे आवर्जून लक्ष दिले जाते. प्रत्येकाच्या अंगणामध्ये झाडांची गर्दी दिसते. विशेष करून प्रत्येक जण अंगणामध्ये फळझाडं आवर्जून लावतो. गार्डनिंग इथल्या लोकांचा सर्वात आवडता छंद आहे. येथील लोक आपल्या कुटुंबासाठी विशेष वेळ देतात. कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकमेकांशी ॲटॅच असतो. सर्वजण एकमेकांची काळजी घेतात.
कुटुंबासह सहलीला जाणे येथील लोकांना खूप आवडते. हे ऐकून आश्चर्य वाटेल पण फिनलँडचे लोक स्मार्टफोन आणि टीव्हीपेक्षा रेडिओ ऐकणे आणि पुस्तक वाचण्याला जास्त महत्त्व देतात. तिथे प्रत्येकाला एक तरी छंद असतोच. जगातील ट्रेंड्स फॉलो करण्यापेक्षा “ज्यात समाधान मिळतं, जे आवडतं ते करावं” अशी फिनलँडच्या लोकांची सोपी फिलॉसॉफी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे पालक आपल्या मुलांना सोशल व्हायला शिकवतात. सार्वजनिक ठिकाणी या लोकांचे वागणे अतिशय सभ्य आणि सहकार्याचे असते. इतरांना मदत करायला घरातूनच शिकवण मिळत असते. बस किंवा ट्रेनमध्ये एखाद्या गरजूला हे लोक लगेच आपली जागा देतात. शिवाय फिनलँडचे लोक जगातील सर्वात प्रामाणिक लोक मानले जातात. इथे कुणाची काहीही वस्तू हरवली तर ती घरपोच पोहचवली जाते. या देशातील क्राईम रेट सुद्धा त्यामुळे अतिशय नगण्य आहे.
हा देश युरोपमध्ये येतो. अतिशय सुंदर असलेल्या या देशामध्ये माणसं सुद्धा मनाने खूप सुंदर आहेत. स्वतः छंद जोपासणे असो, आपल्या कुटुंबाची काळजी घेणं असो, समाजाविषयी बांधिलकी असो किंवा मग देशाविषयी प्रचंड त्याग करायची तयारी असो हे सर्व गुण फिनलँडच्या सर्व नागरिकांमध्ये दिसून येतात कारण हीच त्यांची संस्कृती आहे. आपला भारत हॅपिनेस इंडेक्स मध्ये १२६ क्रमांकावर आहे. प्राचीन संस्कृतीचा अभिमान बाळगणारा आपला देश आनंदी मात्र का नाही याचा प्रत्येक भारतीयाने विचार करायला हवा. हा विचार करताना आपण प्रत्येकाने फिनलँडच्या नागरिकांकडून धडा घ्यायला हरकत नाही.
-अजय पाटील
सचिव, जिंदगी फाउंडेशन, जळगाव.