मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात काळे झेंडे दाखवून व्यक्त केली नाराजी
जळगाव (प्रतिनिधी) :- राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आज दि. २० रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. धरणगाव तालुक्यातील पिंप्री या गावी जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला नेत्यांसह शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून मोठा संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, दिलेले आश्वासन पूर्ण करा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
यावेळी माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले की, हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. त्यांनी वारंवार कर्जमाफी करणार म्हणून आश्वासन दिले होते. मात्र शेतकऱ्यांची त्यांनी शुद्ध फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. शेतकरी बांधवांचा यामुळे मोठा भ्रमनिरास झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे फसवणीस सरकार चालवत आहेत. आज शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुरोगामी महाराष्ट्र असून भाजप सरकारने तातडीने शेतकऱ्यांची दखल घ्यावी. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे सरकार काहीच बोलत नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलन करणारे शेतकऱ्यांनी दिली. दर सात मिनिटाला एका शेतकऱ्याची आत्महत्या होते. कपाशी, मका व इतर पिकांना व्यवस्थित भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खोटे आश्वासन देऊन केवळ शेतकऱ्यांची दिशाभूल झाली आहे, अशाही प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.