स्थानिक गुन्हे शाखेने एकाला यावल तालुक्यात तर दुसऱ्याला मध्यप्रदेशातून केली अटक
जळगाव (प्रतिनिधी) :- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे निष्पाप १४ वर्षीय तेजस गजानन महाजन या बालकाचा खून करून पसार झालेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ३६ तासांत अटक केली आहे. धक्का लागल्याचे किरकोळ कारणावरून तिघांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. तर एकाने चाकूने गळ्यावर वार करून खून केल्याचे धक्कादायक वास्तव तपासात दिसून आले आहे. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रिंगणगाव येथील रहिवासी गजानन नामदेव महाजन यांनी त्यांचा मुलगा तेजस बेपत्ता झाल्याची तक्रार एरंडोल पोलीस ठाण्यात दि. १६ रोजी दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी तात्काळ शोधमोहीम राबवली.(केसीएन)गावाबाहेरील रिंगणगाव खर्चे रोडजवळील एका पडक्या शेतात दुसऱ्या दिवशी काटेरी झाडाझुडपांमध्ये तेजसचा मृतदेह आढळला. मृतदेहाची पाहणी केली असता, त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता आणि त्यांनी रास्ता रोको तसेच महामार्गावर निदर्शने करून आरोपींचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली होती. आरोपींनी खुनाच्या वेळी कोणताही पुरावा ठेवला नसून त्यांना कोणीही पाहिले नसल्याने पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते.
पोलिसांची तत्परता आणि तपास
जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन एरंडोल पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना आरोपींचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन केले. एरंडोल पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तेजस महाजन सायंकाळी कोणासोबत होता, याचा शोध सुरू केला. रिंगणगावात सायंकाळी ५ वाजल्यापासून बाजार असल्याने, सायंकाळी ७ वाजता तेजस हा खर्चे रोडकडे जाताना दिसला होता. त्यानंतर त्याच्या आजूबाजूला फिरणाऱ्या सर्व संशयितांची चौकशी करण्यात आली, परंतु काहीही निष्पन्न झाले नाही.(केसीएन)त्यानंतर पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तेजसचा मृतदेह ज्या शेतात सापडला, त्या ठिकाणी पुन्हा जाऊन आरोपींचा माग काढण्याचे निर्देश दिले. पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली. तेजसचा मृतदेह ज्या शेतात सापडला, त्यापासून ५० फूट अंतरावर राहणाऱ्या आणि मध्यप्रदेशातील खरगोण परिसरातून शेतीकामासाठी आलेल्या काही कुटुंबांची चौकशी सुरू केली.
आरोपींचा लागला माग
चौकशीअंती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती मिळाली की, तेथे वास्तव्यास असलेले हरदास वास्कले (रा. नांदीया, ता. भगवानपुरा, जि. खरगोण, मध्यप्रदेश) हा पत्नी समिता आणि मुलांसोबत तर त्याचा शेजारी सुरेश खरते (रा. धोपा, ता. झिरण्या, जि. खरगोण, मध्यप्रदेश) हे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी सकाळीच दुचाकीवरून रवाना झाले आहेत. पेरणीचे दिवस असताना मालकांना न सांगता हे संशयित निघून गेल्याने पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला.
(केसीएन)या माहितीनंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शोध पथकाची तीन पथके रवाना केली. पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमणुकीस असलेले पोकों गौरव पाटील यांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषणाद्वारे हरदास वास्कलेचा शोध घेतला असता, तो फैजपूर-रावेर मार्गे जात असल्याचे दिसून आले. तात्काळ महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर नाकाबंदी लावण्याचे आदेश फैजपूर आणि रावेर पोलीस स्टेशनला देण्यात आले.
नाकाबंदी करून शिताफीने अटक आणि कबुली
फैजपूर येथील सहा. पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी भुसावळ-फैजपूर येथे नाकाबंदी लावली असता, संशयित हरदास ढेमश्या वास्कले (वय २८, रा. खरगोन, मध्यप्रदेश) मोटारसायकलवर येताना दिसला. त्याला पळण्याची संधी न देता, शिताफीने ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे आणि त्यांच्यासोबतच्या पोना श्रीकृष्ण देशमुख, सफौ रवि नरवाडे, पोहवा संदिप चव्हाण, गोपाळ गव्हाळे, यशवंत टहाकळे, पोकों बबन पाटील, प्रदीप सपकाळे, प्रियंका कोळी, चापोहवा महेश सोमवंशी या कर्मचाऱ्यांनी हरदास वास्कलेची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
हरदासने सांगितले की, त्याचा शेजारी सुरेश खरते आणि गावातील रिचडिया कटोले हे तिघे गावात फिरत असताना, समोरून येणाऱ्या मयत तेजस महाजनला सुरेश वास्कलेचा धक्का लागला. यावरून सुरेश वास्कलेने तेजसला शिवीगाळ करून मारहाण केली.(केसीएन)तेजस विरोध करत असताना तिघांनी त्याला मारहाण केली आणि रिचडिया कटोलेने त्याच्याकडील चाकूने तेजसच्या गळ्यावर वार करून त्याला गंभीर जखमी करून ठार केले. कोणीही आपल्याला पाहिले नाही असे पाहून तिघांनी तेजसला उचलून सुरेशने खांद्यावर घेऊन आडमार्गाने त्यांच्या झोपड्यांच्या बाजूला असलेल्या शेतात काटेरी झाडाझुडपांमध्ये नेऊन ठेवले. तसेच त्यांनी हा प्रकार कोणालाही न सांगता कमालीची गुप्तता पाळली.
दुसऱ्या आरोपीची अटक आणि पुढील तपास
हरदासच्या कबुलीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पो. उपनिरीक्षक शरद बागल, अकरम याकुब, हरिलाल पाटील, विजय पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, विष्णु बि-हाडे, संदीप पाटील, प्रविण मांडूळे, राहुल कोळी, किशोर पाटील, पोकों प्रदीप चवरे, विलेश सोनवणे, पोहवा दामोदरे, रविंद्र पाटील यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी सुरेश नकला खरते (वय ३५) याचा शोध घेतला. त्याला धुपा, ता. झिरण्या, जि. खरगोण, मध्यप्रदेश येथून डोंगरवस्तीतून भंगारघाटी धुपा गावी जवळपास १० किमी पायी जाऊन ताब्यात घेतले.(केसीएन) दोन्ही आरोपींची एकत्रित चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यांचा तिसरा साथीदार रिचडिया कटोले याचा शोध घेण्यासाठी सहा. पो.निरी. डोमाळे आणि कर्मचाऱ्यांचे पथक रवाना करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना एरंडोल पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड आणि त्यांचे कर्मचारी करत आहेत.