राष्ट्रीय लोकअदालतीत आदेश
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी दि. ९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात करण्यात आले होते. लोकअदालतेत एका मोटर अपघात नुकसान भरपाई प्रकरणी ८० लाख रुपयाची तडजोड यशस्वीरित्या दोन्ही पक्षांमध्ये लोकन्यायालयासमोर करण्यात आली.
मूळ चाळीसगाव येथील रहिवाशी जयश्री हेमंत चौधरी यांचे पती हेमंत विष्णू चौधरी यांचा दि. २५/०१/२०२१ रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. अपघाताची तीव्रता एवढी गंभीर होती की, मयत हेमंत विष्णू चौधरी यांचा घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू झाला होता. सदरचा अपघात हा वाहनचालक साबीर खान मोहम्मद खान त्यांच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे झालेला असल्याने व अपघाताला सर्वस्वी समोरील वाहन चालक व मालक जबाबदार असल्याने अर्जदार जयश्री चौधरी यांनी विरुद्ध वाहनचालकाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदवली. सदर फिर्यादीच्या अनुषंगाने गुन्हा नोंदविण्यात आला.
मयत हे घटनेच्या वेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी येथे कायमस्वरूपी यंत्र चालक या पदावर कार्यरत होते. मयत हे घरातील एकमेव कमावते व्यक्ती असल्यामुळे मयत यांचे वारस जयश्री हेमंत चौधरी (पत्नी), त्यांचे दोन अज्ञान मुली ज्यांचे वय केवळ ८ व १० वर्षे आहे. मयताचे वडील विष्णू देवचंद चौधरी व आई यांनी जळगाव येथील मोटर अपघात दावा प्राधिकरणात ॲड. महेंद्र सोमा चौधरी व त्यांचे सहकारी मार्फत मोटार अपघात नुकसान भरपाई मिळणेकामी २०२१ साली दावा दाखल केला. सदर दावा हा दुचाकी चालक साबीर खान, अपघात करणारे वाहन क्रमांक – एमएच ०४ एचडी ४०७४ चा मालक दीपक काशिनाथ गायकवाड व या वाहनांची इन्शुरन्स कंपनी चोलामंडलम यांच्याविरुद्ध दावा दाखल केला. सदर दावा सुरू असताना विमा कंपनीने देखील त्यांचा जबरदस्त युक्तिवाद मेहरबान प्राधिकरणासमोर मांडला.
सदरचा दावा हा मोटर अपघात दावा प्राधिकरणाचे सदस्य व जिल्हा न्यायाधीश – ४ जे जे मोहिते यांच्या समक्ष कामकाज सुरू असताना सदरचे प्रकरण हे दि. ९ डिसेंबर रोजीच्या लोकन्यायालयात दोन्ही पक्षांच्या संमतीने व अर्जदारांचे वकील ॲड. महेंद्र सोमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लोक न्यायालयात ठेवण्यात आले. त्याअनुषंगाने राष्ट्रीय लोक अदालतेच्या दिवशी चर्चेअंती सदर प्रकरणात विमा कंपनीने नुकसान भरपाई पोटी ऐंशी लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे संमती अर्जदारांना दर्शवली. सदर प्रकरणी अर्जदारांतर्फे ॲड महेंद्र चौधरी, ॲड श्रेयस चौधरी, ॲड हेमंत जाधव, ॲड सुनील चव्हाण यांनी बाजू मांडली. चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे योगेश धसे, ॲड अनिल चौगुले, ॲड प्रसाद गोडबोले यांनी कामकाज पाहिले.
संपूर्ण कोर्टकचेरीचे काम हे कमीत कमी वेळेत झाल्याने व एक ठोक रक्कम मिळाल्याने अर्जदाराला समाधान होते. त्याकरिता अर्जदारांनी राष्ट्रीय लोक अदालत याचे जळगाव येथे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल जळगाव येथील विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश एस पी सय्यद व लोकन्यायालयाचे पॅनल क्रमांक दोन चे पॅनल प्रमुख एस व्ही केंद्रे – तदर्थ जिल्हा न्यायाधीश – १ जळगाव व पॅनलचे सदस्य ॲड हेमंत गिरणारे यांचे आभार मानले.