(देविदास विसपुते प्रतिनिधी)
जामनेर – तालुक्यातील माळपिंप्री येथील पाझर तलावामध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता उघडकीस आली आहे. त्यांच्यासोबत असलेले चार तरुण मात्र सुखरूप आहेत. याबाबत घटनास्थळी पोलीस माहिती घेत आहेत. जिल्ह्यात दोन दिवसात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या आणि बुडून मृत्यू पावलेल्या तरुणांची संख्या आता ५ झाली आहे.
किशोर आत्माराम पाटील (वय ३१), नरेश संजय पाटील (वय २४) दोघे रा.माळपिंपरी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यासह आणखी चार मित्र हे गणेश विसर्जनासाठी पाझर तलावात गेले होते. तिथे गणेश विसर्जन करत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा तोल गेला. त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूचे नागरिक धावून आले. त्यांनी तात्काळ मच्छीमारांच्या सहकार्याने त्यांना बाहेर काढले.
दोघेही तरुणांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. यामुळे दोघेही तरुणांच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला असून त्यांनी आक्रोश केला. जिल्हाभरात गेल्या दोन दिवसात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या पण बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची संख्या आता ५ झाली आहे. जामनेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी याबाबत घटनेची माहिती घेत असून पुढील नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.