जळगावच्या पिंप्राळा हुडको येथे शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव ते शिरसोली रेल्वे डाऊन लाईनवर एका तरूणाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. १३ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली होती. पोलीस याप्रकरणी शोध करीत होते. दरम्यान, हा मृतदेह पिंप्राळा हुडको भागातील १९ वर्षीय तरुणाचा असल्याचे ५ दिवसांनी निष्पन्न झाले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एस.व्ही. मोरे, स्टेशन मास्तर, जळगाव रेल्वे स्टेशन यांनी खबर दिल्यानुसार अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेली आहे.अनोळखी पुरूष वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष हा दि. १३ रोजी रोजी २२:४० वा पुर्वी जळगाव ते शिरसोली डाऊन रेल्वे लाईनवर खांबा क्र. ४१५/२३ ते ४१५/२७ चे दरम्यान रेल्वे अपघात झाल्याने मयत झाला आहे, असे खबरीत म्हटले होते. (केसीएन) त्यानुसार रामानंद नगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी नोंद घेऊन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला होता.
गेले तीन दिवस झाल्यावर त्याची ओळख पटली नव्हती. तर बुधवारी बेवारस म्हणून त्याचे अंत्यसंस्कार होणार होते. मात्र बुधवारी दि. १७ जुलै रोजी सण असल्याने पोलीस वर्ग बंदोबस्तात असल्याने एक दिवस मृतदेह शवागारातच होता. तेवढ्यातच गुरुवारी सकाळी मृतदेहाची ओळख पटली. मृताचे नातेवाईक येऊन त्यांनी ओळख पटवली. (केसीएन) सदर तरुणाचे नाव ज्ञानेश्वर सुरेश भिल (वय १९, रा. पिंप्राळा हुडको, रा. जळगाव) असे निष्पन्न झाले. त्याच्या पश्च्यात आई मालुबाई, वडील सुरेश असा परिवार आहे. वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात. दरम्यान, तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण तपासात दिसून येईल अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात नोंद करण्यात आली आहे.