धरणगाव शहरात शेत शिवारातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव शहरात राहणाऱ्या तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गिरीश सुकदेव माळी (वय ३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गिरीश माळी हा पत्नी कविताबाई, आई आशाबाई, वडील सुकदेव दयाराम माळी आणि दोन मुले मयुरेश, कार्तिकी यांच्यासह धरणगावात राहत होता. तो आणि त्याचा मोठा भाऊ स्वप्नील माळी हे दोघेही वडिलांच्या नावावरील धरणगाव शिवारातील शेतीत एकत्र काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता गिरीश आणि त्याचा भाऊ स्वप्नील हे धरणगाव शिवारातील पाटाजवळील शेतात भेंडी तोडायला गेले होते. दुपारी भेंडी तोडत असताना गिरीशने स्वप्नीलला ‘मी पाणी पिऊन येतो’, असे सांगितले आणि तो विहिरीकडे गेला.
गिरीशला बोलविण्यासाठी स्वप्नीलने विहिरीकडे जाऊन पाहिले असता, तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गिरीश माळी याला तपासून मृत घोषित केले. धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.