दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आल्याने प्रशासनावर संताप
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील खेडी खुर्द येथील धनगर गल्ली, वार्ड नं. ३ मधील महिला शौचालयाच्या जागेतून गेलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेल्या अनेक महिन्यांपासून लिकेज असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिक पंकज रावते यांनी ही माहिती दिल्यावर ग्रामीण आरोग्य सेवक आकाश यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली, मात्र अद्यापही यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
खेडगाव येथील कुटीर रुग्णालयाकडून दुर्लक्ष?
खेडी खुर्द आणि खेडगाव या दोन्ही गावांमध्ये दूषित पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ग्रामस्थ आजारी पडून दवाखान्यात दाखल होत आहेत. याबाबत खेडगाव येथील कुटीर रुग्णालयाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती देऊनही, त्यांनी ग्रामसेवक आणि सरपंच यांना दूषित पाण्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे कळवूनही, ग्रामपंचायतीकडून दूषित पाण्याचे निर्जंतुकीकरण करून स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी कोणतीही पाऊले उचलली गेली नाहीत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
आरोग्य विभागावर ग्रामस्थांचा रोष
गावात कुटीर रुग्णालय असूनही आरोग्य विभाग या गंभीर समस्येकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर आरोग्य विभागावर शिंगाडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा पंकज रावते यांनी दिला आहे.
या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करावी आणि दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा, भविष्यात या समस्येचे गंभीर परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.