जळगाव तालुक्यातील बोरनार येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोरनार येथे पती-पत्नीच्या वादात राग उफाळून आला. यात संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून त्यानंतर स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दि. १९ रोजी सकाळी ६ ते ७ वाजता घडली. घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे.
आनंदा उर्फ छोटू महारु धामोळे (धनगर, वय ४५) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पत्नी, २ मुलांसह ते राहत होते. शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)त्यांचा मोठा मुलगा विनोद याने आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. तर लहान मुलगा पप्पु हा दहावीत शिकत आहे. त्यांच्यासह घरात आनंदा धामोळे यांच्या आई या देखील राहतात. मात्र, त्या दोन दिवसांपासून जळगाव येथे आपल्या मुलीकडे आल्या होत्या. त्यामुळे घरात धामोळे दांम्पत्य व दोन्ही मुलेच होती. त्यांची पत्नी रेखा धामोळे (वय ४१) यांच्यासोबत मंगळवारी दि. १९ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास पती आनंद यांचा किरकोळ वाद झाला. या वादातून संतापलेल्या आनंद धामोळे यांनी रागाच्या भरात पत्नी रेखा यांच्या डोक्यावर, हातावर कुऱ्हाडीने जबर वार केले.
या हल्ल्यात रेखा धामोळे गंभीर जखमी झाल्या. पत्नीचा मृत्यू झाला असे समजून, छोटू धामोळे यांनी सकाळी ६ वाजता घराबाहेर पडून म्हसावद रेल्वे गेटजवळ रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रेखा धामोळे यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.(केसीएन)प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी धामोळे यांची दोन्ही मुले, विनोद ( वय १९) आणि पप्पू (वय १५) हे खालच्या घरात झोपलेली होती. तर दोन्ही पती-पत्नी वरच्या पत्र्याच्या खोलीत झोपली होती.
सकाळी ६ वाजता मोठा मुलगा विनोद झोपेतून उठल्यावर तो वरच्या खोलीत केला. त्यावेळी त्याला आई जखमी अवस्थेत दिसली. त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने आईला रुग्णालयात दाखल केले. वडील घरात नसल्याने ग्रामस्थांनी शोध घेतला असता, सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह म्हसावद रेल्वे गेटजवळ रेल्वे रुळांजवळ आढळून आला.(केसीएन)दरम्यान, नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये काही विषयांवरून किरकोळ वाद सुरू होते. मंगळवारी पहाटेही त्यांच्यात वाद झाले, याच वादातून हा दुर्दैवी प्रकार घडला. मात्र, या वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.