जळगाव (प्रतिनिधी) – राज्यभरात भाजपाचे कार्यकर्ते नाराज आहेत. म्हणूनच ते राजीनामे देत आहेत’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीका केली आहे. अहमदगरमध्ये भाजपच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.

एकनाथ खडसे आज सकाळी जळगावात त्यांच्या मुक्ताई निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी खडसेंना अहमदनगर जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याबाबत विचारणा केली असता, खडसे म्हणाले की, ‘संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे देण्यास सुरुवात झाली आहे. हे कार्यकर्ते नाराज असल्यानेच ते राजीनामे देत आहेत. नाराजीचा हा परिणाम आहे’, असे खडसे यांनी सांगितले.
अहमदनरमध्ये भाजप धुसफूस चव्हाट्यावर
अहमदनगर जिल्हा भाजपा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भाजपच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. एवढंच नाहीतर श्रीरामपूर तालुक्यातील सदस्यांनी राजीनामा देऊन संचालन समिती स्थापन करत वेगळी चूल मांडली आहे.
राज्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वर्षानुवर्षे काम करणार्या काम करणार्या भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर मनमानी कारभार करत असून पक्षाची ध्येयधोरणे न राबवता मनमानी कारभार करत असल्याचा निषेध करण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्यासह परीसरातील 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांनी आपल्यापदाचा रविवारी राजीनामा दिला आहे.







