वादळामुळे भिंतीखाली दबून ५ म्हशी, गायदेखील मृत्युमुखी
एरंडोल (प्रतिनिधी) :- तालुक्यात दि. ११ जून रोजी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. या भीषण वादळात रिंगणगाव आणि फरकांडे येथे भिंत कोसळून दोन जेष्ठ नागरिकांना जीव गमवावा लागला. तर तालुक्यात विविध ठिकाणी भिंत पडल्याने पशुधनाचीदेखील हानी झाली आहे. पडले आहेत.
बुधवारी दि. ११ जून रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास किरकोळ पावसासह अचानक सुसाट्याचा वारा सुरू झाला. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, नागरिकांची अक्षरशः दाणादाण उडाली. या वादळामुळे शहरासह तालुक्यातील अनेक घरांची पत्रे उडून गेली, शेकडो झाडे उन्मळून जमीनदोस्त झाली, तर विजेचे खांब आणि तारा जमिनीवर कोसळल्या. वाऱ्याच्या तीव्रतेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकही जमीनदोस्त झाले, ज्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच, धरणगाव रस्त्यावर झाडे कोसळल्याने रात्री उशिरापर्यंत वाहतूक बंद होती. नारायण सीताराम पाटील (वय-६८) आणि गोपाळ मोतीराम पाटील (वय-७५) या रिंगणगाव व फरकांडे येथील दोन्ही वयोवृद्धांना घराची भिंत कोसळल्याने जीव गमवावा लागला. याव्यतिरिक्त, जवखेडा बुद्रुक येथे एक गाय व एक म्हैस यांच्या अंगावर भिंत कोसळून त्यांचा मृत्यू झाला, तर उमरदे येथेही चार म्हशी भिंतीखाली सापडून मृत्युमुखी पडल्या आहेत. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.