तालुक्यातील सुमारे २१० कि.मी. नाले व नदीपात्रांचे खोलीकरण आणि रुंदीकरण होणार; लोकसहभागातून उपक्रम
जळगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव तालुक्यात वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळ आणि पुराच्या दुश्चक्रावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी ‘जलसंकल्प धरणगावचा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. नाला खोलीकरण म्हणजे शेतीच्या भविष्यासाठीचा विमा आहे. नाला खोलीकरणातून पाणी थांबते, पाणी जमिनीत मुरते आणि त्यामुळे विहिरी व बोअरवेल जिवंत राहतात. नाल्यातील गाळ हा काळ्या आईचं सोनं असून तो शेतात गेला तर जमिनीची सुपीकता वाढते. या कामासाठी शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक भार येणार नाही. ही योजना शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी असून सर्वांनी या उपक्रमाला भरघोस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून आणि सीएसआर निधीच्या माध्यमातून पाळधी – चांदसर जि.प. गट (टप्पा क्र. १) अंतर्गत या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या लाडली येथील फार्म हाऊस परिसरात शुभारंभानिमित्त आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात पालकमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला जैन इरिगेशन सिस्टीमचे चेअरमन अशोक जैन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, डीआरडीएचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी , इंफ्राचे संचालक आश्विन अग्रवाल व सर्व्हे टिम अरुण घाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “आज मी तुमच्यासमोर पालकमंत्री म्हणून नाही, तर एक शेतकरी म्हणून उभा आहे. माझ्यापेक्षा गाव आणि शेतकरी मोठा असून पाणी म्हणजे शेतकऱ्याचं जीवन आणि भविष्य आहे.” धरणगाव तालुका प्रामुख्याने पावसावर अवलंबून असून अनियमित पावसामुळे पावसाळ्यात पूर व उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. नदीपात्र व नाल्यांमध्ये साचलेल्या गाळामुळे पाणी साठवण क्षमता घटली आहे. ‘जलसंकल्प धरणगावचा’ या उपक्रमातून नाल्यांमधील गाळ काढून तो शेतकऱ्यांना विनामूल्य दिला जाणार असून त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढेल व भूजल पातळी सुधारून खरीप व रब्बी हंगामासाठी शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण होईल. बांभोरी आणि कानळदा येथे बंधारा मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पांतर्गत धरणगाव तालुक्यातील सुमारे २१० किलोमीटर लांबीच्या नाले व नदीपात्रांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात येणार आहे. नदीपात्रातील साचलेला गाळ काढून काठांचे बळकटीकरण केले जाईल. तसेच विद्यमान बंधारे व के.टी. वेअर यांची दुरुस्ती करून आवश्यकतेनुसार नवीन बंधाऱ्यांची उभारणी करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील अनेक भाग मोठ्या प्रमाणात डार्क झोनमध्ये जात असून भविष्यात बोअरवेलसाठी परवानगी मिळणे कठीण होऊ शकते. त्यामुळे नाला खोलीकरणासारखे जलसंधारणाचे उपक्रम शेतकऱ्यांच्या हिताचे असून शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प यशस्वी करावा. या कामासाठी प्रशासन स्तरावरून आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांनी सांगितले की, पाणी अडवून ते जमिनीत जिरवल्यास त्या परिसरातील शेती आणि शेतकरी दोघेही समृद्ध होतात. कांताई बंधाऱ्यामुळे परिसरातील पाच किलोमीटरपर्यंतच्या भागात पाण्याची उपलब्धता वाढून बागायती शेतीला चालना मिळाली आहे. बांभोरी आणि कानळदा येथे बंधारा उभारल्यास गिरणा नदीकाठच्या सुमारे ४० गावांतील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. या उपक्रमासाठी जैन इरिगेशनकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शाहीर संग्राम जोशी आणि संदीप जोशी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वावर तसेच “पाणी अडवा – पाणी जिरवा” या अभियानावर बहारदार पोवाडे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.तसेच धरणगावचा जलसंकल्प – समृद्धीकडे वाटचाल” या विषयावर आधारित तयार करण्यात आलेली माहितीपट (डॉक्युमेंटरी) यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आली. यावेळी उपस्थित ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा रुमाल टोपी व मोठे रोप देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील नाला खोलीकरणाच्या कामाच्या शुभारंभाबाबत माहिती देत या उपक्रमामुळे जलसंधारणाला मोठी चालना मिळणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा परिषद सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे व शेतकऱ्यांचे आभार मानले. यावेळी लोकप्रतिनिधी, परिसरातील पदाधिकारी, प्रगतशील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.









