यावल शहरातील बुरुज चौकातील घटना
यावल (प्रतिनिधी) :- शहरातील बुरुज चौकाजवळ शुक्रवारी दि.२७ जून रोजी एका कंटेनरने पायी जाणाऱ्या महिलेला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात गंभीर जखमी झालेल्या ५८ वर्षीय महिलेचा जळगाव येथे उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. हि घटना शहरातील आठवडे बाजारातील अतिक्रमणामुळे घडल्याचे नागरिकांचे म्हणणे असून हा अतिक्रमणाचा प्रश्न आम्ही निकाली काढू असा इशारा पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे.
शुक्रवारी सायंकाळी याच बुरुज चौकात चुंचाळे येथील रहिवासी कस्तुरबा चैत्राम सावकारे (वय ५८) या बाजारात जात असताना, (आर.जे. ०९ जी. डी. ४९७०) या क्रमांकाच्या कंटेनरवरील चालक आबिद खान नवाब याने त्यांना धडक दिली. या अपघातात कंटेनर थेट महिलेच्या डाव्या पायावरून गेल्याने त्यांचा पाय पूर्णपणे निकामी झाला आणि त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र रात्री उशिरा त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर या राज्य महामार्गावर यावलमध्ये दर शुक्रवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात रस्त्याच्या कडेला दुकाने आणि हातगाड्या लागल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे नेहमीच कोंडी होते. पोलिसांनी या महामार्गावरील अतिक्रमणांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी सांगितले आहे.