दोन्ही उमेदवारांच्या तिकिटाविषयी अद्यापही संभ्रम कायम
जळगाव (प्रतिनिधी) :- भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी दि. १३ मार्च रोजी महाराष्ट्रातील २० लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये जळगावला माजी आ. स्मिता वाघ व खा. रक्षा खडसे यांना तिकीट मिळाले आहे. मात्र भाजप हा चतुर पक्ष असून मागील वेळेप्रमाणे याही वेळेला धक्कातंत्र वापरण्याची शक्यता आहे. यंदा परिस्थिती विचित्र झाल्यामुळे भाजपापुढे सध्या धक्कातंत्राशिवाय कुठलाच पर्याय उरलेला दिसत नाही.
लोकसभा मतदारसंघाची सन २०१९ या वेळेची आणि आता २०२४ या वेळेची दोन्ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात नेत्यांना फोडून आपल्याकडे वळवून घेतलेले आहे. त्यामुळे राज्यात दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर हे दोन्ही मित्र पक्ष नाराज होऊ नये यासाठी देखील भाजप काळजी घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी २० लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा झाली आहे. यात उत्तर महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात चार महिला व एक पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ, रावेर मतदारसंघात रक्षा खडसे आणि नंदुरबार मतदार संघात हिना गावित यांना अनपेक्षित उमेदवारी मिळाली आहे. कारण अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी तसेच भाजपच्या प्रगती पुस्तकांमध्ये रक्षा खडसे व हिना गावित यांच्या विषयी असलेले कमी मार्क असे सर्व कारण पाहता त्यांना उमेदवारी मिळणार नाही याबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र सर्व चर्चांना बाजूला टाकून हिना गावित व रक्षा खडसे यांनी उमेदवारी पटकावली आहेत. शिवाय मागील वेळेप्रमाणे स्मिता वाघ यांना देखील उमेदवारी मिळाली आहे.
मागील वेळी २०१९ साली स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिला होता. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. मात्र भाजपामध्ये अनेक गटांचा विरोध पाहता तसेच महत्त्वाच्या नेत्यांनी केलेला विरोध बघता भाजपाला उन्मेष पाटील यांना खासदारकीचे तिकीट द्यावे लागले होते. त्यानुसार उन्मेष पाटील हे निवडून आले होते.
स्मिता वाघ यांचा आता संभाव्य लोकसभा उमेदवार म्हणून सध्या प्रचार देखील नाही आणि स्मिता वाघ यांना पक्षाचा उमेदवार म्हणून मागील वेळेप्रमाणे भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी पुन्हा विरोध करण्याची दाट शक्यता आहे. माजी खा. ए. टी. पाटील यांना देखील उमेदवारी मिळण्याबाबत काहीशी संधी होती. मात्र भाजपाने स्मिता वाघ यांची पुन्हा एकदा निवड केली आहे. मात्र ही निवड केवळ निवडच् राहील काय ? हा खरा प्रश्न आहे.
दुसरीकडे भाजपचे मित्र पक्ष शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी जळगावची लोकसभा मतदारसंघाची जागा आम्हाला मिळावी म्हणून आग्रह धरला होता. त्याबाबत त्यांनी काही आक्रमक भूमिका देखील मांडली होती. मात्र हा मतदारसंघ भाजपकडेच राहिला. आता तर भाजपने स्मिता वाघ यांच्या रूपाने उमेदवार देखील घोषित केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गट देखील स्मिता वाघ यांची उमेदवारी कितपत स्वीकारतो हा खरा प्रश्न आहे. अंतर्गत कलह, अंतर्गत गटबाजी, अंतर्गत विरोध यामुळे स्मिता वाघ यांच्या उमेदवारीची मोठी कसोटी लागणार आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट भाजपाच्या उमेदवारांना कितपत स्वीकारतात आणि उमेदवार जर कायम राहिला तर त्याला निवडून आणण्यासाठी दोन्ही मित्र पक्ष कितपत मेहनत घेणार हा खरा आता प्रश्न आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी आता भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांचे कोणते उमेदवार घोषित करतात याकडे देखील भाजपचे खरे लक्ष लागून आहे. विरोधी पक्ष कोणता उमेदवार घोषित करतात, यानंतर पुन्हा एकदा भाजप धक्कातंत्र वापरून विजय मिळवण्याकरिता खान्देशातील उमेदवारांपैकी कोणाचीही उमेदवारी रद्द करू शकतात. भाजपच्या धक्का तंत्राविषयी राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा नेहमीच बघायला मिळत आहे. या वेळेला मोठ्या मिशनचे लक्ष ठेवल्यामुळे भाजप कुठलीच रिस्क स्वीकारायला तयार नाही. हेच चित्र सध्या दिसत आहे.