सीकर (वृत्तसंस्था ) ;- मुलाच्या मृत्यूचे दु:ख अनावर झाल्यामुळे आई-वडील आणि दोन मुलींनी फाशी घेऊन आत्महत्या केली. राजस्थानातील सीकर येथे ही घटना घडली आहे. मुलाशिवाय जीवन जगणे व्यर्थ आहे, या भावनेने त्यांनी आपले आयुष्य संपवल्याचे समजते.
राजस्थानातील सीकर गावातील राधाकिशनपुरा येथे राहणारे हनुमान सैनी यांचा मुलगा अमर हा पोलिसांत भरती होण्याची तयारी करत होता. त्यावेळी मैदानात धावण्याचा सराव करत असताना अमरला अचानक ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या मृत्यूचा धक्का संपूर्ण कुटुंबाला बसला. त्यामुळे घर, शेती, दुकान, नोकरी हे सगळं असूनही आता आमचा मुलगा हयात नाही, त्याच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. तोच आमचे आयुष्य होता. आता जगण्याची इच्छा नाही, असे वाटून आणि मुलाच्या जाण्याच्या अतीव दु:खामुळे मयताच्या वडिलांनी पत्नी आणि दोन मुली यांच्यासह राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली.
मुलाच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब तणावात होते. आत्महत्येपूर्वी या कुटुंबियांनी लिहिलेली एक चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. त्यामध्ये त्यांनी मुलांच्या मृत्यूमुळे झालेले दु:ख सहन न झाल्याने संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचे कारण लिहिले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा शोध पोलीस घेत असून त्यांनी चारही मृतदेह शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठवले आहेत.