५२ हजारांचा संसारोपयोगी मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत, लक्ष्मी नगर भागात बंद घरांमध्ये घरफोडी करून संसारोपयोगी वस्तू चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरट्यांकडून ५२ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

दोन महिने बंद घराला लक्ष
लक्ष्मी नगर येथील रहिवासी राजेंद्र दुसाने यांचे घर गेल्या दोन महिन्यांपासून बंद होते. १२ नोव्हेंबर रोजी घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी त्यांच्या घरातून एलईडी टीव्ही, फ्रीज, कुलर, गॅस शेगडी तसेच तांबे-पितळीच्या मौल्यवान भांड्यांसह इतर संसारोपयोगी वस्तू लंपास केल्या होत्या. या घटनेनंतर दुसाने यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तत्काळ गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांची तत्परता, टोळीला अटक
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने पो. उपनिरीक्षक राहुल तायडे आणि चंद्रकांत धनके यांच्यासह अनुभवी कर्मचाऱ्यांचे एक विशेष पथक नेमले. गोपनीय माहितीच्या आधारे या पथकाने लक्ष्मी नगर परिसरात सापळा रचला आणि मुख्य आरोपी संदीप तुळशीराम शेवरे याला ताब्यात घेतले.
कडक चौकशीदरम्यान, संदीप शेवरे याने आपला साथीदार राहुल सुपडू चौधरी आणि एका अल्पवयीन मुलासह मिळून ही घरफोडी केल्याची कबुली दिली.
रिक्षासह मुद्देमाल जप्त
पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींकडून चोरीस गेलेला ५२ हजार रुपये किमतीचा सर्व मुद्देमाल जप्त केला. तसेच, गुन्ह्यात सहभागी असलेल्या राहुल चौधरी यालाही अटक करण्यात आली असून, चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा देखील पोलिसांनी जप्त केली आहे. एमआयडीसी पोलिसांच्या या यशामुळे लक्ष्मी नगर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.









