शासकीय रुग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदन, जिल्हाधिकाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा
जळगाव (प्रतिनिधी) – येथील मुलींच्या शासकीय बालसुधारगृह येथे १४ वर्षीय मुलीने १२ ऑगस्ट रोजी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या मुलीचा मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. यामुळे तिच्या परिवार शोकाकुल झाला असून बुधवारी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
मयत मुलगी ही रिमांडहोम म्हणजे बालसुधारगृह येथे राहत होती. १२ ऑगस्ट रोजी तिला घरी जायचे होते. मात्र वडील बाहेरगावी जायचे असल्याने तिला जाता आले नव्हते. त्यामुळे ती रिमांड होम येथेच होती. १२ ऑगस्ट रोजी अचानक तिने शौचालयात जाऊन दोरीने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. तेथील एका महिला कर्मचाऱ्याला याबाबत लक्षात येताच त्यांनी लगेच तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
रुग्णालयात गेली ११ दिवस तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यांनतर मंगळवारी २२ रोजी तिचा संध्याकाळी मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारी तिच्या मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोनि मीरा देशमुख करत आहेत. दरम्यान, घटनेचा तपास सुरु असून, याप्रकरणी अधिक माहिती पोलीस घेत आहेत अशी प्रतिक्रिया निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी “केसरीराज” ला दिली आहे.
सदरहू मुलीच्या आत्महत्येप्रकरणी कुठलीच चिठ्ठी सापडली नसून, आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. तसेच, याप्रकरणी कुठलीही रिमांड होम अंतर्गत चौकशी समिती नेमलेली नाही, अशी माहिती अधीक्षिका जयश्री पाटील यांनी “केसरीराज” शी बोलताना दिली आहे. दरम्यान, या मुलीच्या आत्महत्येप्रकरणी कुठली चौकशी समिती नेमली जाईल काय ? जर कुणी दोषी असेलच, तर कारवाई होणार का ? याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटनेचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांची याबाबत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.