जळगाव ( प्रतिनिधी ) : – जिल्ह्यातील चांदसर या ठिकाणी तलाठी यांना मारहाण झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आलेली आहे. वर्ष संपायला एक दिवस बाकी असताना जिल्हाधिकाऱ्यांनी गिरणा वाळू असलेल्या भागातील सरपंचाची बैठक लावली. या बैठकीत कोणताही ठोस असा निर्णय झाला नाही. मात्र तुमचे गाव तुम्हीच राखा असे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
सोमवार दि. ३० रोजी जिल्हा नियोजन समितीमध्ये धरणगाव, अमळनेर, भडगाव, पाचोरा, जळगाव ग्रामीण व इतर ठिकाणी सरपंच, तलाठी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना बैठकीस आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याने आपापल्या समस्या मांडल्या व वाढीव वाहतूक थांबवण्यासाठी त्यांनी मागणी केली. मात्र यावेळी तुमचे गाव तुम्हीच राखा असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना कोणतेही संरक्षण देण्यात येईल की नाही, त्यांनी कारवाई करून कोणाला सांगायचे याबद्दल कोणत्या सूचना देखील देण्यात आल्या नाहीत.
आम्ही अवैध वाळू थांबवू मात्र आम्हाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण किंवा पोलीस प्रशिक्षण मिळेल काय याबाबत या बैठकीत सांगण्यात आले नाही. मग अवैध वाळू उपसा वाहतूक कशी थांबवावी असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. कारण अवैध वाळू वाहतूक करणारे आमच्या अंगावर धावून येतात त्यांच्याजवळ शस्त्र असतात. आमच्याकडे कोणते शस्त्र काहीच नसते. मग ही वाळू वाहतूक कशी थांबवावी असा गंभीर सवाल या वेळेला सरपंचांनी जिल्हा प्रशासनाला केला.