जळगाव ;- तालुक्यातील आसोदा येथील एका २८ वर्षीय तरुणाने कौटुंबिक तणावातून दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली असून यामुळे गावात खळबळ उडाली आहे . मयत रामचंद्र उर्फ भुरा देवराम (माळी) महाजन (वय-२८) रा.ढंढोरे नगर, आसोदा ता.जि.जळगाव असे या तरुणाचे नाव असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुरत येथून गावी आला होता .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, रामचंद्र उर्फ भुरा हा तरूण गेल्या सहा महिन्यांपासून सुरत येथे आपल्या पत्नी निकिता व मुलगी रक्षा सोबत राहत असून चालकाचे काम करतो. गावात ग्रामपंचायतीची निवडणूक असल्यामुळे तो गावी आला होता. कौटुंबिक कारणामुळे त्यांची पत्नी निकिता ह्या मुलगी रक्षाला घेवून खांमगाव बुलढाणा येथे माहेरी निघून गेल्या होत्या. त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याचे कळते. आज दुपारी ३.३० वाजेच्या पुर्वी घराच्या दुसऱ्या मजल्यावर दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. वडील देवराम सूपडू माळी हे वरच्या घरात गेल्यावर मुलाने गळफास घेतल्याचे उघडकीला आले. तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मयताच्या पश्चात आई कल्पनाबाई, वडील देवराम माळी, भाऊ रामकृष्ण, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.








