पोलीस निरीक्षकांची जिगरबाज कामगिरी, जखमी दुचाकी चालकाचा मृत्यू
चाळीसगाव तालुक्यातील मालेगाव रस्त्यावरील घटना
जळगाव (विशेष वृत्तांत) : दुचाकी चालकास जबर धडक देऊन त्याच्या मरणास कारणीभूत ठरलेल्या व घटनास्थळावरुन पलायन करणाऱ्या पिकअप वाहन चालकाचा मित्राच्या कारमधून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील यांनी फिल्मी स्टाइल पाठलाग करुन अटक केली आहे. घटनास्थळावर जमलेले लोक बेदम मारहाण करतील या भीतीने आपण पळून गेल्याची कबुली त्याने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे दिली आहे. दि. २ ऑगस्टला रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास चाळीसगाव – मालेगाव रस्त्यावरील हॉटेल चंद्रा समोर ही अपघाती मृत्यूची घटना घडली होती.
रिहान उर्फ अब्बू अली सय्यद अली (रा. नगरदेवळा ता. पाचोरा जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या पिकअप वाहन चालकाचे नाव आहे. तर रमेश सुनील जाधव (वय २९, रा. ब्राम्हणशेवगे ता. चाळीसगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. दि. २ ऑगस्टला रात्री सव्वा ११ वाजेच्या सुमारास चाळीसगाव – मालेगाव रस्त्यावरील हॉटेल चंद्रा समोर हि घटना घडली होती.(केसीएन) या घटनेमधील अनोळखी दुचाकी चालकास (क्र. एमएच १५ डीएन २०८०) या वाहनाला पिकअप चालक रिहान याने (एमएच ०६ बीडब्ल्यू ०२६७) जबर धडक दिली. या धडकेत दुचाकी चालक रमेश जाधव याच्या डोक्याला मार लागून तो जागीच ठार झाला होता. घटनेच्या वेळी पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे मित्र प्रितेश कटारिया असे दोघेजण हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेलं होते.
त्याचवेळी अपघात घडल्यानंतर दुचाकीस धडक देणारा पिकअप वाहनचालक न थांबता चाळीसगाव शहराच्या दिशेने पळून गेला. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रितेश कटारिया यांना सोबत घेऊन त्यांच्या कारने संबंधित पिकअप वाहन चालकाचा पाठलाग सुरु केला. हॉटेलमधील ग्राहकांनी देखील परिचित तरुणांना फोन करून पलायन करणाऱ्या पिकअप चालकास पकडण्याची सूचना केली. देवळी गावातील तरुणांनी तात्काळ प्रतिसाद देत रस्त्यावर येत पिकअप वाहन पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु पिकअप चालकाने न जुमानता आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने पुढे दामटले. त्यामुळे पिकअप वाहनास अडवता आले नाही.(केसीएन)पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी रात्र गस्तीवरील अंमलदार विश्वास पाटील, अजय पाटील, शरद पाटील, मोहन सूर्यवंशी, गणेश कुंवर, नंदू महाजन आदींना या अपघाताबाबत माहिती देऊन पिकअप वाहन पकडण्यासाठी मालेगाव रोड वरील बिलाखेड बायपासवर तातडीने नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले.
मालेगाव रोड वरील बेलगंगा साखर कारखान्याजवळ अपघात घडवीणारे पिकअप वाहन दिसले. वाहन चालकाला थांबवण्याचा इशारा करुनही तो थांबला नाही. अखेर प्रितेश कटारिया यांनी ओव्हर टेक करुन त्याला थांबण्यास भाग पाडले. पो.नि. संदीप पाटील यांनी त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. अखेर त्याने अपघाताची कबुली देत, लोक मारतील या भीतीने अपघात स्थळावरून पळ काढल्याचे कबुल केले. संभाव्य परिस्थिती लक्षात घेत पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी त्याला मेहुणबारे पोलीस स्टेशनला आणले. अपघाताचे साक्षीदार हॉटेल चंद्राचे मालक राहुल पवार यांच्या तक्रारीवरुन मेहुणबारे पोलीस स्टेशनला पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेतील मयत दुचाकी चालकाची ओळख पटवण्याचे काम सुरु करण्यात आले. पिकअप चालकास पकडण्याकामी मदत करणारे प्रितेश कटारिया तसेच वाहन अडवण्याचा प्रयत्न करणा-या देवळी गावातील ग्रामस्थांचा पोलीस स्टेशनतर्फे लवकरच सत्कार करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.