जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांनी केली होती तक्रार
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वावडदा येथील ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सरपंचांबाबत तक्रार केली होती. ग्रामसभा न घेणे, खोटे प्रोसिडिंग करणे, आर्थिक गैरव्यवहार करणे असे विविध आरोप तक्रार अर्जात होते. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अर्ज सोमवारी निकाली काढला असून वावडदा सरपंच राजेश वाडेकर यांना अपात्र घोषित केले आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
वावडदा गावचे सरपंच राजेश वाडेकर यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे ग्रामपंचायतमध्ये कारभार चुकीचा केला. पंधरा वित्त आयोगातून केलेल्या कामांचं नियमानुसार वाटप केलेले नाही. तसेच कोणत्याही कामांचे ई-टेंडर केलेले नाही. तसेच शासकीय निधीचा गैरवापर केला असे विविध आरोप तक्रार अर्जामध्ये करण्यात आले आहे.
सदर तक्रार अर्जावर अनिल आत्माराम पाटील, राजेंद्र रामदास मराठे, राकेश नामदेव भिल, भारती संतोष पवार, रत्नाबाई मुकुंदा पाटील, वर्षा विनोद पवार यांच्या सह्या होत्या. सदर अर्जावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सुनावणी सुरू होती. सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी जिल्हा न्यायदंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी निकाल देऊन सरपंच राजेश वाडेकर यांना अपात्र घोषित केले आहे.