अमळनेर तालुक्यातील बोदर्डी गावाजवळील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : पांझरा नदीला अक्कलपाडा धरणातून पाणी सोडल्यामुळे मोठा पूर आला आहे. त्यात मंगळवारी दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी मासे पकडायला गेलेला तरुण नदीपात्रात अडकून पडला. त्याला बाहेर काढण्यास गेलेला तरुणदेखील अडकल्याने दोघांना पट्टीच्या पोहणाऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. यामुळे प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पांझरा नदीला पूर आल्याने नदीपात्रात कोणी जाऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तरीही काही जण सूचनेकडे दुर्लक्ष करीत आहेत. बोदर्डे गावाजवळ चोंदी गावाजवळ संजय राजेंद्र भिल हा मंगळवारी मासे पकडायला गेला होता. नंतर तो पुराच्या पाण्यात अडकून गेला. त्याला काढायला काशीनाथ प्रकाश भिल हा गेला होता. मात्र पांझरा नदीला पूर आलेला असल्याने तोही नदी पात्रात अडकून पडला होता. सदरची घटना कळताच उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना कळताच त्यांनी मंत्रालयाच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला कळवले.
त्यानुसार धुळे येथील एसडीआरएफ पथक पाचारण करण्यात आले होते. घटनेची गांभीर्याने दखल घेऊन प्रांत अधिकारी महादेव खेडकर व तहसीलदार रुपेश सुराणा यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील गायत्री चौधरी यांनी उमेश कोळी, दादू भिल, सागर भिल, समाधान भिल या पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलावले. त्यांच्या मदतीने अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यात आले. ट्रॅक्टरच्या टपवर बसवून एकेकाला बाहेर सुखरूप काढून प्राथमिक केंद्र, मांडळ येथे भरती करण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती ठीक आहे. प्रशासकीय अधिकारी व यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला.