ग्रामस्थांसह अग्निशामक दलाकडून साडेतीन तासांनी नियंत्रण
अमळनेर ( प्रतिनिधी ) – शहराबाहेरील अंबर्षी टेकडीला अचानक आग लागून सुमारे हजारो झाडे जाळून खाक झाली. अग्नितांडवाची ही घटना बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. सुमारे साडेतीन तास आगीचे तांडव सुरू होते. समाजकंटकांमुळे टेकडीवर आठ ते दहा वेळा आगी लागून नुकसान झाले आहे.
सुरुवातीला हनुमान टेकडीकडील भागाला आग लागली. त्यानंतर आग पसरत नक्षत्र वन, अमृत वन, रोटरी वन, आयएमए वन जळून खाक झाले. टेकडीवर सुमारे ४५ हजार झाडे लावलेली आहेत. याठिकाणी पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी यांचा वावर आहे. जमिनीची धूप थांबवण्यासाठी तसेच प्राण्यांना, पक्ष्यांचे घरटे सुरक्षित राहावे, यासाठी जमिनीवरील गवत ‘जैसे थे’ ठेवण्यात आले होते.
या टेकडीच्या संवर्धनासाठी शहरातील अनेकांनी योगदान दिले आहे. टेकडी ग्रुप नियमित देखभाल करतो. या टेकडीवर ५ हजार पिंपळाची झाडे आणि इतर अशी सुमारे २५ हजार झाडांना या आगीचा फटका बसला आहे. यामुळे टेकडीचा ५० ते ६० टक्के भाग जळाला आहे. टेकडीवर येणारे काही दारूडे, गांजा, विडी, सिगारेट पिणाऱ्यांमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज आहे.
बुधवारी दुपारी टेकडीला आग लागल्याची माहिती मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना मिळताच त्यांनी अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी, दिनेश बिन्हाडे, फारुख शेख, जफर पठाण, मच्छिंद्र चौधरी, सत्येंद्र संदानशिव, आकाश संदानशिव, भिका संदानशिव, आकाश बाविस्कर यांना दोन मोठे व एक लहान बंब तसेच आरोग्य विभागाचे ट्रॅक्टर घेऊन टेकडीवर पाठवले. अग्निशमन दलाचे कर्मचारी पाण्याने आग विझवत होते तर अंबर्षी टेकडी ग्रुपचे सदस्य, महिला हाऊसिंग ट्रस्टच्या महिला झाडाचा पालापाचोळा आपटून शर्थीचे प्रयत्न करून आग विझवत होते. साऱ्यांच्या प्रयत्नाने सुमारे साडे तीन तासाने आग शमविण्यात यश आले.