जालना (प्रतिनिधी) – गुढीपाढव्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत “आनंदाचा शिधा” देणार असल्याचे शासनाने सांगितले. कशाचा आनंद? घरात पाच माणसे असताना एक किलो यांच्या काकाने खाल्लं आहे का? एक किलो रवा, तेल, डाळ आणि साखर देणार आहेत. चार किलोमध्ये काय होणार आहे कुणाला माहिती. तुम्ही तुमचे कुटुंब यामध्ये रावबून दाखवा. राज्यात चेष्टा, मस्करी चालली आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात केली.
जालना दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नवीन साखर गाळप युनिटचं उद्घाटन केले. त्यावेळी अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. कायदा, घटनेनुसार राज्य चाललं आहे का याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. बेरोजगारी वाढत चालली आहे. याबद्दल अधिवेशनाच्या चार आठवड्यांमध्ये काहीच सांगितले गेले नाही. महागाई आकाशाला भिडली आहे. शेतमजुरांनी, गरीब माणसांनी जगायचे कसे? याचे उत्तर सरकार द्यायला तयार नाही.
सगळीकडे निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान लावले गेले आहे. कशाचा बोडक्याचा गतिमान. काय गतिमान? तुम्ही रोज तुमचे फोटो आम्हाला बळजबरीने बघायला लावता. पेपर उघडल्यावर यांचे फोटो असतात. याऐवजी शेतकऱ्यांसाठी काय केले ते सांगा ना. आम्ही राज्यकर्ते नव्हतो का? पण आम्ही अशा पद्धतीने जाहीरातबाजी केली नाही. मी बारामतीमधून निवडून आलो आणि रोज जाहिरात द्यायला लागलो तर लोक म्हणतील आम्ही जाहिरात द्यायला निवडून दिले आहे का? एखाद्या दिवशी जाहिरात दिली तर समजू शकतो.
त्यांना आता भीती वाटत आहे. अधिकाऱ्यांकडे याबाबत मी विचारणा केली तेव्हा त्यांनी मला सांगितले की, सरकार आल्यानंतर पदवीधर मतदारसंघात त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांचे डोळे उघडले, असेही अजित पवार म्हणाले.