जळगाव तालुक्यातील उमाळा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी):- तालुक्यातील उमाळा-गाडेगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात पिंप्राळा हुडको येथील दाम्पत्य यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २५ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केल्याचे दिसून आले.


मुझफ्फर अली सय्यद बबन (वय-६०) आणि ताहेराबी मुजफ्फर अली (वय-५५) दोन्ही रा. पिंप्राळा हुडको, जळगाव असे मयत झालेल्या दांपत्याचे नाव आहे. शहरातील पिंप्राळा हुडको परिसरामध्ये मुझफ्फर अली सैय्यद बबन हे आपले पत्नी ताहेराबी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. मसाला विक्री करून ते आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आज बुधवारी २५ मार्च रोजी त्यांचे चुलत भावाच्या मुलीचे लग्न असल्या कारणामुळे ते पत्नी ताहेराबी यांच्यासोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ इजे ३८९८) जळगाव येथून फर्दापूर येथे गेले होते. लग्न आटोक्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील उमाळे ते गाडेगाव दरम्यानच्या पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर दोघेजण पुलाखाली पडले.
या भीषण अपघातात मुझफ्फर अली सय्यद बबन आणि ताहेराबी मुजफ्फर अली हे गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना खाजगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता दोघांना मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच गर्दी केली होती. अचानक या घडलेल्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबाबत अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. त्यांच्या पश्चात दोन मुलं, सुना, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.









