डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या प्रयत्नांना यश
जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या एका गर्भवती महिलेला तातडीने सिझेरियन आणि ऑब्स्टेट्रिक हिस्टेक्टोमी करून यशस्वीरीत्या जीवदान देण्यात आले. रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ञांच्या जलद निर्णयक्षमता, कुशल टीमवर्क आणि अत्याधुनिक सुविधा यामुळे ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.
याबाबत माहिती अशी की, संगीताकुमारी नामक भुसावळ येथील महिलेची पूर्वी दोन वेळा सिझेरियन प्रसूती झालेली असल्यामुळे तिचे गर्भधारणा-जोखीम प्रमाण आधीच वाढले होते. विशेषतः या वेळी प्लासेंटा खाली सरकणे, रक्ताच्या गाठी तयार होणे, तसेच गर्भपिशवी मूत्राशयाला चिकटणे अशी एकापेक्षा अधिक गंभीर लक्षणे दिसत होती. या गुंतागुंतीमुळे प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होण्याचा मोठा धोका निर्माण झालेला होता.रुग्णालयात दाखल होताच महिलेची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले-रक्तदाब लागत नव्हता, हार्ट रेट १४० च्यावर पोहोचला होता, शरीरात तीव्र वेदना व अस्वस्थता होती. या धोकादायक परिस्थितीत वेळ दवडण्याची कोणतीही संधी नव्हती. स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील, डॉ. मृदूला मुंगसे, डॉ. रश्मी संघवी, डॉ. ऐश्वर्या चलवदे, डॉ. पल्लवी शेंडगे या टीमने तात्काळ निर्णय घेत आपत्कालीन सिझेरियन सुरू केले.शस्त्रक्रियेदरम्यान प्लासेंटा चुकीच्या ठिकाणी असल्याने आणि गाठी तयार झाल्यामुळे सतत रक्तस्त्राव होत होता. यावर एकमेव खात्रीशीर उपाय म्हणजे ऑब्स्टेट्रिक हिस्टेक्टोमी (गर्भाशय काढण्याची आपत्कालीन शस्त्रक्रिया) हा होता. कठीण, जोखमीची आणि वेळेशी स्पर्धा करणारी ही शस्त्रक्रिया तज्ज्ञांच्या टीमने अत्यंत कौशल्य यशस्वीरित्या पूर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर महिला रूग्णाला काही तास आयसीयूमध्ये काळजीपूर्वक उपचार सुरू ठेवण्यात आले. या ठिकाणी मेडीसीन विभागातील प्रमुख डॉ. चंद्रय्या कांते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रिषभ पाटील, डॉ. हर्ष मेहता यांच्या देखरेखीखाली प्रकृती स्थिर आहे.या जटिल प्रकरणामुळे पुन्हा एकदा डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील अत्याधुनिक प्रसूती सुविधा, कुशल डॉक्टरांची तत्परता आणि टीमवर्क अधोरेखित झाले आहे. योग्य वेळेत घेतलेला निर्णय, आधुनिक वैद्यकीय साधने आणि अनुभवी तज्ज्ञांची मदत यामुळे मातेचा जीव वाचला.










