‘टेन्शन विरूद्ध मेडिटेशन’ कार्यक्रमात हजारो जळगावकर सहभागी
जळगाव (प्रतिनिधी) – स्वत:च्या उणीवा बघत तक्रार करणे म्हणजे ध्यानसाधना सुरू झाल्याचे समजावे. मात्र आपण दुसऱ्यांच्याच उणीवा शोधत फिरतो आणि आपली ऊर्जा घालवितो. पायात काटा गेला तर त्याच्या वेदना तुम्हांला जाणवतील तसे कोणाला दु:ख दिले तर तेही बोचते. ते दूर केल्याशिवाय समोरच्याला मन:शांती लाभू शकत नाही.जेव्हा केव्हा विपरित परिस्थिती डोके वर काढेल तेव्हा अर्हम् धूनच्या लयीने ध्यान साधना केली तर त्याची स्पंदनं तुम्हांला शांतीच्या महासागरात घेऊन जातील, असे उपाध्याय प.पू. प्रविणऋषीजी यांनी ‘टेन्शन विरूद्ध मेडिटेशन’ वर मार्गदर्शन करताना सांगितले.
तुमचं मन हेच शांतीचं केंद्रबिंदू आहे. हे नेहमीसाठी लक्षात ठेवा. तुमचं घर मंदिर आहे. मात्र त्याची आत्मा तुमच्या हृदयामध्ये विराजमान आहे. बाहेरच्या मंदिरात केवळ मूर्ती मिळू शकते पण आपल्या आंतरआत्मात समावलेली परात्माची शक्ती आपण ध्यानाच्या माध्यमातून निश्चित अनभवू शकतो.कुठलेही तंत्रज्ञान आपल्याला त्रासिक वाटत असेल तर ते व्यर्थ आहे. टेन्शन फ्री होण्याच विचार करून नका त्याच तणावाला आपले पॉवर हाऊस बनवा आणि मग बघा की तुमचे स्वचिंतन टेंन्शन व डिप्रेशनला कसे पळविते. बुद्धिचा उपयोग केला तर तुम्हाला कुणीही ‘बुद्ध’ होण्यापासून रोखू शकत नाही.टाईम मॅनेजमेंट तुम्ही खूप केले ह्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे सेल्फ मॅनेजमेंट आहे व ते जीवनात खूप उपयोगी पडू शकेल. वेळेला नियंत्रण करू शकता मात्र आत्मनियंत्रण महत्त्वाचे आहे. युद्धभूमीतही श्रीकृष्ण हसत प्रवेश करित. मात्र आम्ही मानव घरात प्रवेश करताना तोंड उतरवून का जातो हे बदलले पाहिजे. असे उपाध्याय प.पू. प्रविणऋषीजी यांनी ‘टेन्शन विरूद्ध मेडिटेशन’ वर मार्गदर्शन करताना सांगितले.
सुरवातीला तीर्थेशऋषीजी यांनी ‘पाना नहीं जीवन.. करना है साधना..’ हे सुंदर भजन सादर केले.छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे ‘टेन्शन विरूद्ध मेडिटेशन’ हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सकल जैन श्री संघ, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, सर्व रोटरी क्लब जळगाव परिसर, सर्व लायन्स क्लब परिवार, भारत विकास परिषद जळगा, केशवस्मृती प्रतिष्ठान जळगाव यांनी आयोजिलेल्या कार्यक्रमात हजारो जळगावकरांनी सहभाग घेतला. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. चे सहकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले. सुरवातीला नवकार मंगलाचरण रेवती चतूर व सदस्य यांनी म्हटले. प्रास्ताविक नंदलाल गादिया यांनी केले. सपना छोरिया यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले. अर्हम विज्जा या प्रकल्पाची माहिती किरण गांधी यांनी दिली. पसायदान व मांगलिकने कार्यक्रमाचा समारोप झाला.