दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष बच्चू कडू : “शासन दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रमात विविध योजनांचा लाभ
जळगाव (प्रतिनिधी) :- अधिकाऱ्यांनी दिव्यांगासाठी चांगलें काम करावे. त्यांची निश्चितच प्रशंसा होणार आहे. दिव्यांगासाठी आपल्याला प्रचंड काम उभे करायचे आहे. संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दर महिन्याला थेट पगार मिळावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा चालू आहे. राज्यात तीन कोटी दिव्यांग बांधव आहेत. कालानुरूप दिव्यांगासाठी पारंपरिक सायकली वाटप न करता आत ई-सायकली वाटप करण्याची गरज आहे. गावातील चांगल्या लोकांनी एकत्र येत दिव्यांगाचे उद्योग स्थापन व्हावेत यासाठी बचतगट तयार केले पाहिजेत, असे आवाहन ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान’चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.
महाबळ रोड येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदीर येथे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, स्वयंदिप फाउंडेशनच्या मिनाक्षी निकम, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, दिव्यांग अधिकारी भरत चौधरी, प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय भोसले, संभाजी सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य मार्गदर्शक व आमदार बच्चू कडू म्हणाले, जगातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात होत आहे.याचा मनस्वी आनंद आहे. पूर्वी दिव्यांगाच्या पाच टक्के राखीव निधी खर्चासाठी आंदोलन करावे लागत होते. आज शासन स्वतः दिव्यांग अभियान राबवित आहे. ज्याला दोन पाय नाहीत त्यांना सशक्त माणसांसोबत लढावे लागते. मूकबधीर बांधवांला अनेक अडचणी आहेत. दहावीनंतर शिक्षणासाठी फक्त चार शाळा आहेत. अंधांना अनेक अडचणी आहेत. त्यांचा अभ्यास असला तरी परिक्षेसाठी लेखनिक भेटत नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झालेला असतांना राज्यातील दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना नाही. त्यांच्यासाठी लवकरच स्वतंत्र घरकुल योजना राबविणार असल्याची ग्वाही ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान’चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिली. प्रत्येक आमदारांनी आपल्या निधीतून दिव्यांगासाठी ३० लाख रूपये खर्च करण्याची गरज आहे. दिव्यांगांना सहानुभूतीची गरज नसून खऱ्या मदतीची गरज आहे,असेही कडू यांनी सांगितले.
दिव्यांगांना जळगाव जिल्ह्यात सीएसआर फंडाच्या माध्यमातून येत्या काही दिवसांत बॅटरीवर चालणाऱ्या २ कोटी रूपयांच्या ई-सायकलींचे वाटप करण्यात येणार असल्याची ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली. मात्र या सायकलींच्या माध्यमातून दिव्यांगांनी रोजगार केला पाहिजे.अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी समजून घेण्यासाठी महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या सोमवारी विशेष लोकशाही दिन आयोजित करण्यात येईल. जिल्ह्यातील दिव्यांगांना पेन्शनचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबध्द आहे.
प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी सांगितले की, एडीआयपी या योजनेंतर्गत आतापर्यंत ५००० दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दिव्यांगत्वानुरूप अडीच कोटी रूपयांच्या साहित्य साधने व उपकरणांचे वितरण करण्यात आलेले आहे. यावेळी लाभार्थ्यांच्या वतीने स्वयंदिप फाउंडेशनच्या मिनाक्षी निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.