मुंबई;- येथील ५३ पत्रकारांना करोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या आठवड्यात पत्रकार संघानं मुंबईतील पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या करोना चाचणीसाठी कॅम्प आयोजित केला होता. त्यामध्ये १६८ जणांची करोना चाचणी घेण्यात आली. रविवारी मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार १६८ पैकी ५३ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोनाचा संसर्ग झालेले बहुतांश पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियातील असल्याचे समजते.
बीएमसीमधील आरोग्य विभागाचे आधिकारी अमेय घोले यांनी दिलेल्या माहितीनुसार १६८ पत्रकांराच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५३ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी बोलताना दिली आहे.
टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार ३० पेक्षा जास्त पत्रकारांना करोनाचा संसर्ग झाला आहे. टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन आणि मंत्रालयातील पत्रकार संघाच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकांराच्या करोना चाचणीसाठी विशेष कॅम्प आयोजित केला होता. करोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये बर्याच जणांना करोनाची कोणतीही लक्षणेही नव्हती तर अद्याप काही पत्रकारांच्या चाचणीचा अवहवाल येणं बाकी आहे. त्यामुळे ही संख्या आणखी वाढू शकते असंही म्हटलं जाते.
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या देखरेखीखाली १६ आणि १७ एप्रिल रोजी पत्रकार आणि कॅमेरामॅनच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या. मुंबई प्रेस क्लबच्या जवळ या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पत्रकार आणि कॅमेरामॅन यांना सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा, तसेच हात स्वच्छ धुण्यासाठी सॅनिटायझर्सचा वापर करावा, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.